Friday, February 24, 2017

वणवा म्हणजे आपलेच नुकसान


ही भुमाता जिच्या पोटी आपण जन्म घेतला, तिची मनुष्याव्यतिरिक्त ही अनेक संताने आहेत. की जे आपले बांधव आहेत. म्हणजे वृक्ष, वेली, प्राणी,सरपटणारे प्राणी, किडे, मुंग्या, असे असंख्य जीव या भुमातेच्या अंगा खांद्यावर खेळत, बागडत असतात. त्याचप्बरोबर हे असंख्य जीव आपले निसर्गचक्र नीट राखण्याचे काम ही माणसापेक्षा जास्त चांगल्या पध्दतीने करीत असतात. मग माणुस का निसर्गचक्रामध्ये हस्तक्षेप करीत आहे?. डोंगराला आग लावल्यामुळे आपण आपल्याच पायावर कु-हाड मारीत आहोत. 
दरवर्षीच्या पावसाळ्यात उगवलेली लाखो रोपे माणसाच्या वणवा लावण्याच्या अविचारामुळे होरपळुन मरतात. परीणामी झाडाची संख्या वाढत नाही, हिरवे छत्र लुप्त होत आहे. 
दरवर्षी काही पर्यावरण प्रेमी मंडळी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतात. पण ह्या वणव्यामुळे जेवढी झाडे लावली जातात त्याच्यापेक्षा हजारपट जास्त झाडे मरतात. निसर्ग स्वतःची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे, माणसाने फक्त वणवा लावण्यासारख्या गोष्टींपासुन स्वतःला परावृत्त करणे गरजेचे आहे.


आग लावणा-या माणसांकडे फेसबुक नसते, व्हॉट्सऍप नसते, ऍम्ड्रॉईड फोन नसतो, त्यामुळे तुमच्या माझ्या सारख्यांचे (म्हणजेच हा संदेश वाचणा-यांचे) काम आहे की आपाअपल्या गावात अशा प्रत्येक व्यक्ति पर्यत हा संदेश तोंडी पोहोचवावा, शेतकरी, गुराखी,कातकरी,आदी लोकांना याबाबत जागरुक करणे गरचे आहे. कारण ते लोक आपल्या पेक्षा जास्त जवळ असतात निसर्गाच्या, निसर्गाच्या कुशीत असतात, त्यामुळे जसे वृक्ष वेली, प्राणीमात्राम्चे सर्वाधिक नुकसान होते, तसेच शेतकरी, गुराखी, आदीवासी बांधवांचे देखील खुप नुकसान होते, व संपुर्ण पर्यावरणाचे होणारे नुकसान तर सगळ्या चराचर, प्राणीमात्रांना , इकोसिस्टमला भोगावे लागते आहे.

वणव्याविषयी एक गैरसमज आहे. तो काय आहे  व त्यांच्याविषयी सत्य माहीती जाणुन घेऊयात.

वणवा लावल्यामुळे पुढच्या वर्षी गवत चांगले येते - मुळात वणवा लावल्यामुळे जमीनीची सर्वाधिक धुप होती. गवत जळुन गेल्याने, त्या गवताच्या मुळांनी माती धरुन ठेवलेली मोकळी होते. तसेच पहील्या पावसात ही माती वाहुन जाते. म्हणुन आपणास पहील्या पावसात डोंगरद-यांतुन वाहणारे पाणी गढुळ असल्याचे दिसते. याचाच आणखी एक दुष्परीणाम असाही होतो आहे की काही वर्षांनी आपली सर्वच्या सर्व धरणे निम्मी मातीने व निम्मी पाण्याने भरतील. पाणी साठा कमी होईल, परीणामी नागरी लोकसंख्येला पर्यायाने धरणक्षेत्रातील लोकांना अधिक भुरदंड पडेल. कारण पाणी कमी पडले की आणखी जास्त धरणांची आवश्यकता निर्माण होईल व पर्यायाने नवीन धरणे पावसाच्या क्षेत्रातच बांधली जातील व तेथील लोकांस(वेल्हा, मुळशी, मावळ, भोर) संसार पाठीवर लावुन दुस-या भागात धरणग्रस्त म्हणुन जावे लागेल.

जर आपण वणवा लावण्याचे थांबवु शकलो, तर त्याचे फायदे खालील प्रमाणे होतील
१. पावसाचे प्रमाण वाढेल
२. पावसाची अनिश्चितता कमी होईल
३. झाडे झुडपे वाढल्याने, पावसाचे पाणी जमीनीत खोलवर मुरेल व त्यामुळे तुमच्या विहीरी, बोअरवेल ला पाण्याची कमतरता होणार नाही.
४. वनौषधी ची वाढ देखील होईल. आपल्या भागात, हिरडा, गेळा, बेहडा, आवळा, कुडा,कढीपत्ता, शिकेकाई, रिठा, वावडींगी आणखीही अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्या या डोंगरद-यात अमाप प्रमाणात वाढायच्या पुर्वी पण वणवा लावण्याच्या अविचाराने यातील कित्येक वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या वनस्पती म्हणजे आपल्या येथील लोकांस अर्थार्जनाचे एक वरदानच निसर्गाअने दिले आहे. आपण करंटे त्याला वणवा पेटवुन हे वरदानच झिडकारतो.
५. वनफळे व भाज्या -  करवंदा पासुन मे महीनाभर दररोज किमान ३०० ते ४०० रुपये आपल्याकडील स्त्रिया कमावताना आपण मागच्या वर्षीच पाहीले.(शेणवड/बालवडच्या महीला). विचार करा, जर वणवा पेटला नाही व करवंदीच्या नव नवीन जाळ्या तयार झाल्या तर येत्या काही वर्षात , करवंद हा एक संघटीत व्यवसाय या रुपाने नावारुपास येईल. आळु, तोरण , फणस, जांभळं यांचे पर्यायही आहेत आपल्याकडे.
वनभाज्या ..म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेली पार्टीच जणु...शेंडवेल, मुरुट आणखी ब-याच वन भाज्या आपणास जंगलात मिळतात. पण मित्रांनो जरा आपल्या आजी आजोबांस विचारुन पाहा बरे, की या भाज्यांचे प्रमाण पुर्वी किती होते व आता किती आहे? व या सा-यास कारणीभुत आहे हा वणवा..
६. वन-आधारीत अर्थव्यवस्था - लाकुड, गवत,फळे, औषधे, स्वतपुरती निसर्गाने घेणे ठिक आहे. पण योग्य नियोजन करुन यातुन एक पर्यायी व्यपार उदीम देखील उभा राहु शकेल.
७. पर्यटन वाढ - जरा विचार करा, सध्या, मढे घाट, लिंगाणा इत्यादी ठिकाणे शहरातील लोकाम्साठी आकर्षण आहे. पण ते केवळ पावसाळ्यात. जर आपण आपला परीसर हिरवागार करु शकलो, वनराई बहरु देऊ शकलो, तर बारा महीने , तेरा काळ चालेल असा पर्यटन व्यवसाय देखील वाढेल. शहरात ड्रायव्हर, आचारी, वेटर अशी कामे करण्यापेक्षा आपण आपल्याच भागात उद्योग व्यवसाय करु शकता. 

मित्रांनो, वणवा थांबवण्यात जर आपण यशस्वी झालो तर आपण स्तःतसोबतच निसर्गाचे देखील कल्याण करण्यात यशस्वी होऊ.

हेमंत ववले.

Sunday, February 19, 2017

काय महाराज सुफी पंथांचे होते?

जास्तीत जास्त लोकांपर्यन्त शेयर करा व शेवटी दिलेल्या लिंक वर जाऊन या लेखास "१" म्हणजे "एक" असे रेटींग देऊन आपापली नाराजी नोंदवा.

आज सकाळ वर्तमान पत्रातील सप्तरंग या पुरवणीमध्ये छापलेल्या भोकाटेच्या लेखास माझी प्रतिक्रिया...

काय महाराज सुफी पंथांचे होते?
भोकाटे पिसाळलाय आणि सकाळ वाले सुध्दा पिसाळले आहेत.

सकाळ समुहा सारख्या प्रतिष्टीत व निष्पक्ष माध्यमाने अशा प्रकारच्या लेखास प्रसिध्द करणे "सकाळ" च्या प्रतिमेस धक्का आहे. लेखक एकीकडे म्हणतो आहे की महाराजांनी सर्व जातीधर्मातील लोकांना सामावुन घेतले व या म्हणण्यास आधार देण्यासाठी काही उदाहरणे देखील दिली आहेत. ही उदाहरणे देताना लेखकाने त्या त्या जातीच उल्लेख न विसरता केला आहे. मुळात जात पाहुन कुणाची नेमणुक केली असेल असे म्हणने महाराजांचा एक प्रकारे केलेला अपमानच आहे. महाराज जात व्यवस्थेला थारा देत नव्हते तर मग जात पाहुन त्यांनी नेमणुका केल्या असतील असे मानणे व सकाळ सारख्या प्रगल्भ वृत्तपत्राने असा सुमास लेख प्रसिध्द करावा हे हास्यास्पदच आहे. "व्यक्तिच्या गुणवत्तेच्या आधारावर महाराजांनी नेमणुका केल्या" हे सर्वात महत्वाचे आहे. व अधोरेखीत करणे आवश्यक आहे.
पुढे .... दौलत खान, इब्राहिम खान आदींचा जो उल्लेख लेखकाने केला आहे, तो अर्धवट आहे. हे लोक स्वराज्य निर्मीतीचे ध्येय घेऊन महाराजांसोबत आलेले नव्हते. नंतरच्या काळात ह्या लोकांनी स्वराज्याच्या गनिमांना सामील होऊन साथ दिल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.
जातीच्या नावांचा उल्लेख करताना लेखक "ब्राम्हण" जातीचा उल्लेख करण्याचे टाळतो हा देखील पक्षपातच आहे. "जानवे" शब्दाचा अर्थ प्रतिष्टा असा घेताना जाणीवपुर्वक तेथेही ब्राम्हण जातीचा उल्लेख टाळतो. स्वराज्याच्या यज्ञात सर्व समाजाचे योगदान होते मग काय ब्राम्हण समाजाचे काहीच योगदान नव्हते?
पुढे जाऊन लेखक असे अकले चे तारे तोडतो की महाराज सुफी पंथ मानणारे होते. उद्या म्हणतील महाराज मुस्लीम होते. व अरबस्थानात शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे व महाराजांचे पुर्वज देखील अरबस्थानातुनच आल्याचे पुरावे ही देतील.
माझे म्हणने आहे की महाराजच काय तर यच्चयावत हिंदु समाज सहिष्णु असल्याने आपणास पर-पंथाविषयी आदर नेहमी आहेच. शिवरायांना देखील होता. पण फक्त तेवढीच गोष्ट अधोरेखीत करुन लिहिणे म्हणजे पुनश्च पक्षपात आहे. महाराजांनी सनातन वैदीक पध्दतीने राज्याभिषेक करवुन घेतला. त्याच्या मोहीमा दस-याच्या (सीमोल्लंघन) मुहुर्तावर म्हणजेच वैदीक परंपरेला साजेशा निघत. रामायण महाभारत वाचुन महाराजांचे शिक्षण झाले. लिहिण्यासारखे खुप काही आहे. महाराजांनी सुल्तानी आणि अस्मानी अशा दोन्ही संकटांपासुन येथील प्रजेला संरक्षण देऊन , मग्रुर, धर्मांध,अत्याचारी, बलात्कारी, चारीत्र्यहीन अशा हिंदुस्थानात ज्याकाळी चहु दिशांना इस्लामी राजे, बादशाह व राज्ये होती व हिन्दु केवळ गुलाम होते, अशा वेळी "एक हिन्दु राजा होऊ शकतो" व राज्य ही करु शकतो हे महाराजांनी सिध्द करुन दाखवले.
त्यामुले अधोरेखीत काही करायचे असेल तर "महाराज एक अभिषिक्त हिन्दु राजे होते" हे वाक्य अधोरेखीत करा.
मुळात मावळ्या-मराठ्यांचे जाती-जातीत विभाजन करणारे असे लेखन समाजासाठी घातक आहे. त्यातही समाजमनातुन जाणीवपुर्वक विशिष्ट जातीला विस्मरणात ढकलण्याचे मोठ्या षडयंत्रामध्ये लेखकासोबतच "सकाळ माध्यम समुह" देखील सामील आहे असा दर्प या लेखातुन व त्याच्या सकाळ मधील प्रसिध्दीतुन येत आहे.

http://beta1.esakal.com/saptarang/chatrapati-shivaji-maharaj-jayanti-31165

Saturday, February 18, 2017

मत कोणाला द्यायचे?

मत कोणाला द्यायचे?



निवडणुकांची रणधुमाळी गर्जते आहे गेले अनेक दिवस. उद्या प्रचाराची सांगता होईल. मग हे सगळे भोंगे, पॅंपलेट बॅनर्स होर्डींग लावणे बंद.
उमेदवारांनी स्वतस अधिक मते मिळावी यासाठी जो प्रचार केला त्या प्रचाराचे परीणाम खरच का मतदाराच्या निर्णय प्रक्रियेवर होईल?
प्रत्येक उमेदवाराचे पत्रक घरात येऊन पडले. प्रत्येक उमेदवाराचे भोंगा असलेले वाहन घराजवळुन गेले. अनेक उमेदवारांचे समर्थक सोशल मीडीया वर भरभरुन पोस्ट टाकीत आहेत. अनेक उमेदवारांचे मेसेज  ही आले मोबाईल वर. या सर्वातुन एक ॲनालॉगी सुचली...

बाजारात एकाच प्रकारचे पण अनेक उत्पादकांनी बनवलेले उत्पादन विक्री साठी आहे. ह्या उत्पादनाची जाहीरात गेले बरेच दिवस जोमात सुरु आहे. बर, जाहीरात का करावी लागते हे सर्वांना ठाउक असेलच. आपापले उत्पादनाची माहीती जास्तीत जास्त ग्राहकांपर्यन्त पोहोचवणे, जेणे करुन हे उत्पादन कसे दिसते?, त्याचे फायदे काय? ते अन्य उत्पादनांपेक्षा(प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा) कसे सरस आहे? किमंत कशी कमी आहे? वगैरे वगैरे.. 
ग्राहकापुढे अशा प्रकारे प्रत्येक उत्पादनाची माहीती असते. ग्राहक तुलना करु शकतो. जाहीरातीचे काम एवढेच होते की उत्पादन विषयी माहीती जसे आहे तसे (शक्यतोखोटी कोण देत नाही) जास्तीत जास्त लोकांपर्यन्त पोहोचवणे.
मग ग्राहक स्वतच्या बुध्दीमत्तेचा वापर करुन  निर्णय घेतो. हा निर्णय घेताना तो अनेक गोष्टी पाहतो जसे
१. उत्पादन काय आहे?
२. उत्पादनाची श्रेणी काय आहे?
३. उत्पादनाचा उत्पादक कोण आहे?
४. उत्पादन स्थानिक पातळीवर निर्मित आहे का?
५. उत्पादनात कच्चा माल काय काय वापरला आहे?
६. उत्पादनाची एक्सापायरी तारीख काय आहे?
७. लेबल लिहिले आहे, तेवढेच वजन  आहे की नाही?
८. हेच उत्पादन पुर्वी कधी वापरले आहे का?
९. पुर्वी वापरले असेल तर पुर्वीचा अनुभव कसा होता?
१०. त्याच उत्पादकाचे आणखी एखादे उत्पादन आपण पुर्वी वापरलेआहे का? असल्यास जाहीरात व प्रत्यक्ष सेवा यामध्ये फरक अनुभवास आला का?
११. सगळीच उत्पादने सुमार दर्जाची असतील तर काय ब्रॅंड पाहुन ठरविता येईल का?

तर आता वरील यादी मध्ये 
उत्पादन ऐवजी उमेदवार हा शब्द टाका..
उत्पादक ऐवजी राजकीय पक्ष किंवा विद्यमान उमेदवाराचा पती किंवा पत्नी असे वाचा.
म्हणजेच काय तर या झालेया प्रचारातुन खरच का मतदाराला वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत?

काही निकष पाहु आता..

गुणवत्ता हीन पण पैशेवाले उमेदवार 

कुणी जर आपणास म्हणेल की अरे माझी वस्तु घे , मी तुला वरुन पैसे ही देतो. मटण दारु पार्टी ही देतो.
तर याचा अर्थ काय की आज वस्तु फुकट मिळणार, वरुन पैसे, पार्टी मिलणार...पण निकृष्ट दर्जाची वस्तु खाल्ल्याने मी आजारी पडुन त्याच विक्रेत्याचा भाऊ असलेल्या डॉक्टरकडे जाऊन पैसे घालवील.व  आरोग्य ही गमावेल.
त्यामुळे मित्रहो, पार्ट्या-पैसे देऊ करणा-या (ब-याच जणांनी पार्ट्या खाल्ल्या ही असतील )उमेदवारांना मत देऊ नका. कारण आज हे पैसे खर्च करताहेत तर उद्या निवडुण आल्यावर आपल्यालाच लुटतील.

स्त्री उमेदवार ? की नव-याच्या राजकीय महत्वकांक्षेचे बाहुले?

आणखी एक गंभीर प्रश्न या निवडनुकीच्या निमित्ताने समोर आला..तो म्हणजे सर्व अपेक्षित उमेदवारांच्या पत्न्या, ह्या आरक्षण पडल्यावर रातोरात कशा काय योग्य उमेदवार झाल्या? ज्या स्त्री उमेदवार फक्त आणि फक्त नवरोबांच्या नावावर किंवा नवरोबाच्या अहंकारापोटी रिंगणात उतरल्या आहेत (नव्हे त्यांना त्यांच्या नवरोबांनी वापरुन घेतले आहे), अशा स्त्री उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेबद्दल अभ्यास केल्याशिवाय मत देउ नका.

उमेदवार स्थानिक आहे का?

स्थानिकच का असावा? म्हणजे काय तर, उमेदवार राहतो पुण्यात, त्याची पोर शाळा शिकत्यात पुण्यातल्या एखाद्या इंग्लिश मीडीयम शाळेत, त्याचे वयस्कर आई वडील इलाज घेतात खासगी इस्पितळात, अवस-पुनव ला भारीतल्या कार ने गावाला आल्यवर त्याला गावाकडच्या रस्त्यांची दुरवस्था कशी कळेल बरे? गावाकडे वीज, पाणी याची काय अवस्था आहे हे शहरात राहणा-या उमेदवारास कसे कळेल? गावातील शाळांमध्ये काय प्रश्न आहेत हे ज्याची मुले खासजी शाळांत शिकतात त्या उमेदवारास कसे बरे कळेल?
कसे कळेल? असे म्हणताना मला हे सांगायचे आहे की, जनसामान्यांना ज्या सोई सुविधा आहेत, त्यांचाच उपभोग घेत, असणारास समस्यांविषयी लवकर समजेल.

उमेदवाराचे अर्थार्जनाची साधने काय आहेत?

काय उमेदवाराचे दारु चे बीयरचे (अधिकृत का असेना) दुकान आहे? किंवा होते काय? काय त्याचे परमिट रुम आहे? काय उमेदवार अरेरावी, हफ्तेखोरी अशा प्रकारे पैसे कमावतो? काय उमेदवारास वडीलोपार्जित भरपुर संपत्ती मिळालेली आहे? काय उमेदवाराने जमीनी खरीदी विक्री करुन पैसा कमावला आहे? 
जर चुकुन ही असा उमेदवार निवडुन येत असेल तर नतभ्रष्ट तो उमेदवार नाही तर नतभ्रष्ट व नैतिकता हरवलेले आपण असु , हे लक्षात ठेवा. 

उमेदवार नातेवाईक आहे का?

असु द्या मित्रांनो. कर्तबगार व योग्य उमेदवार असेल व तो तुमचा नातेवाईक, भावकीतला असेल तर करा मतदान त्याला/तिला.
पण मतदान करताना उमेदवार माझ्या भावकीतला आहे, नातेवाईक आहे या एकाच निकषावर मतदान करु नका. 

उमेदवाराचे शिक्षण काय आहे?

मुलभुत प्रश्न हा नाही. त्या ही पेक्षा आपण प्रश्न असा विचारला पाहीजे की, उमेदवाराचे जे काही शिक्षण आहे, त्या शिक्षणाचा उपयोग उमेदवाराने  स्वतच्या आयुष्य बदलण्यासाठी तसेच  समाजासाठी काय केला आहे हे पाहावे.

तुम्ही ज्या उमेदवारास मत देणार तो

१. पोटभरण्यासाठी, कुटुंब चालवण्यासाठी रोज किमान ८ तास काम करतो का? 
(या कामात नोकरी-धंदा-शेती हे अपेक्षित आहे. जमीनी खरेदी विक्री ची दलाली हे काम अथवा धंदा करणारा आधीच "बाद उमेदवार" आहे.)
२. उमेदवाराने प्रचारादरम्यान तुमच्या भागातील समस्यांचे आकलन अभ्यास करुन समस्या समाजासमोर मांडल्या का? व त्या समस्यांचे मुळ शोधण्याचा प्रयत्न करुन त्यावर उपाय योजना काय करता येईल या विषयी काही मुद्दे मांडले का?
३. उमेदवार सभ्य-सुसंस्कृत आहे का ? 
सुशिक्षित असला म्हणजे सुसंस्कृत असतोच असे नाही हे लक्षात असु द्या.
अरेरावी, दादागिरी अशा कुठले प्रसंग उमेदवाराच्या बाबतीत ऐकले असतील तरी अशा प्रसंगाची सत्यता पडताळुन घ्यावी, कसलाही पुर्वग्रह न ठेवता, उमेदवार वरील सर्व निकषांवर(१,२,३ प्रश्नांच्या वरील परीच्छेदातील निकष) खरा उतरतो का? हे पाहावे व मगच मतदान करावे...तर 

सध्यातरी किमान वरील तीन प्रश्नाची उत्तरे जर "हो" असतील तर तुमचा निर्णय योग्य आहे व समाजाच्या हिताचा आहे असे अभिमानपुर्वक समजा.

Tuesday, January 31, 2017

ठेवा भारतीय दर्शनांचा


अष्टावक्र गीता

राजा जनक - चरीत्र दर्शन

रामायण, महाभारत वेदांत आदी ग्रंथांतुन राजा जनकाचा उल्लेख आहेच, तसेच काही पुराणामध्येदेखील राजा जनकाच्या चरीत्राचा उल्लेख आढळतो. बालपणापासुन टिव्ही, सिनेमा आदींतुन आपण जनकास फक्त एकाच व्यक्तिरेखेत पाहीलेले आहे, ते म्हणजे जानकीचा पिता. महादेवी सीता ही जनकाचीच पुत्री आहे व "जनक" या नावावरुनच तिचे नाव जानकी असे ही ठेवले गेले. २० वर्षापुर्वी ज्यांनी महाभारत मालीका टिव्हीवर पाहीली असेल त्यांना जर आठवत असेल तर त्यात दाखवलेला जनक एक हतबल "पिता" आहे असेच आपण आजपर्यंत मानतो आहोत. मालिका व सिनेमे भारतीय महापुरुषांच्या जीवन चरीत्रांना कधीच न्याय देऊ शकणार नाहीत. याला कारण ही तसेच आहे. एका व्यक्तिरेखेवर आपण लक्ष केंद्रीत करावयास गेलो तर त्या व्यक्तिरेखेच्या अनुशंगाने शेकडो व्यक्तिरेखा दृष्टीगोचर होतात. त्यामुळे दुरदर्शन वरील रामानंद सागर यांची मालिका म्हणजे "मर्यादापुरुषोत्तम श्रीराम" या एका व्यक्तिरेखेवर लक्ष केंद्रीत करुन तयार केलेली असल्याने, त्यात इतर पात्रांना तितकास न्याय देता आलेला नाही. असो.

जनक राजाचे वर्णन करताना उपरोक्त ग्रंथ त्याचा उल्लेख करताना अनेकविध विशेषणे वापरतात.
उदा - विदेही. म्हणजे ज्यास देह अहंकारापासुन सुटका प्राप्त असा तो म्हणजे विदेही. खरतर अध्यात्मात या स्तरापर्यंत पोहोचणे म्हणजे खुप मोठी उपलब्धी मानली जाती. देहाभिमान विसरला असा "वि"देही. जो "देह" नाही असा विदेही. अद्वैत मता मध्ये द्वैत नसतेच.  जनकास अद्वैत मताचा उपदेश अष्टावक्र मुनिकडुन झाला, पण जनकास "विदेही" हे विशेषन मात्र अष्टावक्र मुनिंची भेट होण्या आधीपासुनच लावले गेले आहे. सामान्य साधकास देहाभिमान, देहाहंकारापासुन सुटका करुन घेणे त्या अर्थाने सोपे आहे कारण त्याच्या मागे व्याप कमी असतात. पण एक प्रजाहित दक्ष राजा व तो देखील विदेही? हे समीकरण थोडे अजबच वाटते. असेच आश्चर्य व्यासपुत्र मुनि शुकास देखील वाटले व कुतुहलापोटी मेरु पर्वतापासुन म्हणजे त्याच्या निवासापासुन सलग तीन वर्षे पायी भ्रमण करीत मिथिला देशी पोहोचला होता. शुक आणि जनक हा देखील एक अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे. पुन्हा कधी तरी या विषयावर आपण चिंतन करुयात. तर एका राज्याचा कारभार पाहणारा एक व्यक्ति देखील "देहातीत" अवस्थेस पोहोचु शकतो. व हे केवळ भारतातच घडु शकते. बर त्याचे राज्य नुसते येरेगबाळे राज्य नव्हते, तर तेथील प्रजा अत्यंत सुखी व ज्ञानी देखील होती. रोजगार, रस्ते, पाणीव्यवस्थापन, संरक्षण, पर्यावरण आदी सर्वच अंगांनी राज्याची प्रगती इतकी झालेली की हजारो कोस दुरुन चिकित्सक(उदा -शुक मुनि) राज्य शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इथे येत. तर अशा राज्याचा राजा अध्यात्मात देखील प्रचंड गतिमान होता. इथे आवर्जुन एक उल्लेख करावासा वाटतो. तो म्हणजे तथागत भगवान बुध्द देवांचा. भारतीय संस्कृतीने दिलेल्या अनगणित अनमोल नररत्नांपैकी ही दोन रत्ने आहेत. एकाने राजविलास, राजवैभव या सर्वांचा त्याग करुन सलग सहा वर्षे तप करुन , गरजा कमी करुन , कमी अन्न, कमी पाणी, कमी बोलण, तपाच्या शेवटी शेवटीतर बोलणे बंदच, आदी प्रकारे तप करुन "विदेहावस्था" प्राप्त केली. म्हणजे शरीर म्हणजे मी नाही असा साक्षात्कार होणे, अनुभव होणे म्हणजेच विदेहावस्था होय. तर दुसरीकडे राजा जनक आहे, ज्याने राजपाट सांभाळता सांभाळता विदेहावस्थेस प्राप्त झाला. त्याने राजकारभार देखील केला व नुसताच केला नाही तर तो आदर्श केला व परमार्थ ही केला व तो देखील आदर्शच केला.
असो.
जिज्ञासुंनी जनकाचे चरीत्राचे अनुशीलन आणखी ही भिन्न प्रकारे करावे. अनेकविध पैलुंनी युक्त असा हा राजा अलौकिक होता. राजा असुनही योगी होता. राजा असुनही भक्त होता. राजा असुनही तर्कपंडीत होता. राजा असुनही कुशल योध्दा व परम प्रतापी होता. त्याच्या जीवनप्रवासात तो टप्प्याटप्प्याने उर्ध्वगामी गतीस प्राप्त होत होता.

त्यामुळेच भगवान श्रीकृष्णाच्या भगवदगीतेत ज्याप्रमाणे गुरु-शिष्य प्रश्नोत्तरे पाहायला मिळतात त्याप्रमाणे अष्टावक्रगीतेत प्रश्नोत्तरे नाहीत. अष्टावक्र गीतेत "संवाद" पाहावयास मिळतो. दोन अत्यंत बुध्दीमान, अधिकारी पुरुषांचा संवाद अष्टावक्र गीतेत अनुभवास येतो. अष्टावक्र गीता अद्वैत मतातील एक महान ग्रंथ आहे, मग त्या ग्रंथात वर्णन केलेला अद्वैतवाद या दोन व्यक्तिंच्या संवादात झळकणार नाही तरच नवल. इथे गुरु-शिष्य असे द्वैत नाही, हीच या अष्टावक्र गीतेची खुप मोठी उपलब्धी आहे.
टिप - अजुन ही इथे प्रत्यक्ष अष्टावक्र गीतेतील श्लोकांचा अर्थ , त्यावर विश्लेषण करण्याचे मी जाणीवपुर्वक टाळले आहे. जिज्ञासुंनी मुळातुनच या महान ग्रंथाचा अभ्यास करावा यासाठी असे केले आहे. परंतु, जर अष्टावक्र व जनक यांच्या चरीत्राचा अभ्यास असेल तर या गीतोपनिषदात शब्दबध्द केलेला "अद्वैतवाद" समजण्यास सुलभ होईल , अशा कारणाने त्रोटक रुपात जनकाच्या चरीत्राचा व त्याच्या व्यासंगाचा उल्लेख इथे केला आहे.

हेमंत सिताराम ववले.


Friday, January 13, 2017

ठेवा भारतीय दर्शनांचा --अष्टावक्र गीता - एक चिंतन

ठेवा भारतीय दर्शनांचा
अष्टावक्र गीता - एक चिंतन
एकीकडे बायबल उच्चरवाने उद्गोष करीत आहे की "मनुष्य मुळात पापी आहे, व ईशु ला शरण गेल्यावरच त्याच्या पापांचे क्षालन होईल", तर अनादी काळापासुन भारतीय दर्शने , साहीत्य, मनुष्याच्या थोरवीची गीते गात आहेत. आचार्य शंकरांच्या निर्वाण षटकं मध्ये त्यानी "वयं अमृतस्य पुत्रः" असा जयघोष केला. 
आचार्य शंकराच्या आधी कित्येक हजारो वर्षे लिहिल्या गेलेल्या अष्टावक्र गीतेत, मनुष्याच्या थोरवीची, महतीची , मनुष्यातील, नव्हे नव्हे, चराचरातील प्रत्येक जीव , वस्तुतील देवत्वाचे वर्णने शब्दांच्या मर्यादेत बसवुन,त्या शब्दांनाही थोरवी प्राप्त करुन दिली आहे.

मनुष्यामधील देवत्वास स्वीकारणारे, त्याचा जयघोष करणारे, देवत्व साजरे करणारे विचार भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासुन आहेत. हे सगळे एवढ्या साठीच लिहाअयचे की आजकाल भारतामध्ये एक विषिष्ट वर्ग देव,धर्म न मानता, केवळ "माणुसकी हाच आमचा धर्म" अशी टिमकी वाजवताना दिसतात. अशी टिमकी वाजवताना, त्यातील एक अस्पष्ट संदेश, असा दिला जातो की जणु "माणुसकी" नावाची गोष्ट भारतास ठाउकच नव्हती यापुर्वी.
अष्टावक्र गीतेच्या पहील्या अध्यायात, मुनि अष्टावक्र राजा जनकास उपदेश देताना म्हणतात, की तु कोणत्याही वर्णाचा (आजच्या भाषेत जातीचा) असु देत, तु कोणत्याही आश्रमाचा (आश्रम म्हणजे काय माहीत नसेल तर कमेंट मध्ये विचारा) असु देत, तु स्त्री असो वा पुरुष असु देत, तुला संपुर्ण अधिकार आहे, स्व-रुपा ला जाणण्याचा. कारण तु म्हणजे मुळात दॄष्य असणारे, असे काहीच नाहीस, तु शरीर नाही, तु मन बुध्दी अहंकार नाही, तु, म्हणजे तुझे वैभव वा तुझे दारीद्रय नाही, तु म्हनजे तुझ्या अवतीभवतीचा संसार नाही, तु म्हणजे हे विश्व नाहे, तु म्हणजे ही पृथ्वी नाही, तु खर तर या सा-यांचा साक्षी आहेस, चैतन्य स्वरुप आहे, या सा-यंमध्ये जे तत्व सामायिक आहे , ते तुच आहेस.
 शब्दांची किमया, कविकल्पना , उदाहरणे सुरेख दिली आहेत. दुस-या अध्यायात, जनक राजाच्या मुखातुन "स्व-रुपा" विषयी जे काही बोलवले गेले आहे , ते थोड्या अधिक फरकाने माउलींच्या ज्ञानेश्वरीतदेखील आढळते, काही अम्शी तुकोबा रायांच्या अभंगात देखील आढळते. शंकराचार्यांच्या विविध रचनांमध्ये ही अशा प्रकारचे दाखले दिले गेले आहेत.
मी (म्हणजे मानव या अर्थाने वाचा) , शुध्दबोध आहे, मी ज्ञान, ज्ञेय, ज्ञाना असे देखील काहीच नाही, मी या सर्वांच्या पलीकडचा आहे. मला नमस्कार असो.
इतक्या स्पष्ट पणे माणुसपणास नमस्कार करणारे तत्वज्ञान अन्यत्र कुठे आहे? कुठे ही नाही. त्यामुळेच मित्रहो, जो पर्यंत आपण आपल्या पुर्वजांनी दिलेल्या ज्ञानास घेण्यास अनुकुल होत नाही, जोपर्यंत आपण त्यांना स्वीकारत नाही, तो पर्यंत आपणास कधीच कळणार नाही की आपल्या संस्कृतीमध्ये किती वैविध्य , किती स्वातंत्र्य होते. आपले पुर्वज किती गहन तत्वांचे दृष्टे होते, हे आपणास कधी ही समजणार नाही जोपर्यत्न आपण त्यांच्या कार्याचा, तत्वज्ञानाचा अभ्यास करणार नाही.
मुद्दामचे या लेखात दुस-या अध्यायातील श्लोकांवर टिपणे केली नाहीत. आपण स्वतः , निवांत वेळी, एक एक श्लोक वाचुन त्यावर मनन, चिंतन कराल, ही अपेक्षा.
हेमंत सिताराम ववले

Wednesday, January 11, 2017

ठेवा भारतीय दर्शनांचा

ऋषि अष्टावक्र व अष्टावक्र गीता
रामायण, महाभारत तसेच छांदोग्य उपनिषदात, अष्टावक्र चरीत्राचा उल्लेख विस्ताराने आढळतो. ढोबळ मानाने कथा खालीलप्रमाणे आहे.

उद्दालक मुनी, आपल्या गुरुकुलामध्ये स्वतच्या मुलासह(श्वेतकेतु) अन्य ही साधकांना वेद-विज्ञाना आदींचे शिक्षण देत असतात. गुरुवर्य्यांना सुजाता नामक एक सुंदर, सुशील कन्या देखील आहे त्यांच्या आश्रमात, कहोद नावाचा आणखी साधक, जो अत्यंत बुध्दीमान तसेच वेद आदींचा अभ्यासु व निष्णात, साधक देखील असतो. आचार्य उद्दालक, आपल्या उपवर मुलीसाठी आदर्श वर म्हणुन कहोद कडे अपेक्षा ठेवतात. प्रमाणे, कालांतराने, कहोद व सुजाता यांचा विवाह होतो. सुजाता गर्भवती राहील्यावर, सुजाता आपल्या पतीस, ऋषि कहोदास, होणा-या मुलाच्या पालनपोषणासाठी अधिक धनसंपत्ती मिलवण्यासाठी राजा जनकाकडे पाठवते. जनकाकडे, त्याच वेळी "बंधी" नावाचे एक विद्वान ऋषी असतात, जे शास्त्रार्थात निष्णात असतात. बंधी ऋषि, स्वतच्या यशामध्ये इअतके बुडालेले असतात की ते एक विचित्र अट घालुन स्वतचे श्रेष्टत्व सिध्द करण्याचे जणु व्यसनच त्यांन जडलेले असते. जनक राजाच्या आश्रयाने, व अनुमतीने बंधी मुनी शास्त्रार्थ व वादविवाद याची एक स्पर्धा आयोजित करतात व बंधी ज्यांना या स्पर्धेत हरवेल, त्यांना समंगा नदीत जलसमाधी घ्यावी लागेल अशी ती अट असते. कहोद, धन मिलवण्याच्या लालसेने ते आवाअहन स्वीकारतात, व वादविवादात पराभुत होऊन, जलसमाधी घेतात.
इकडे ही बातमी सुजातास समजल्यावर, तिला पश्चाताप होतो. तदपश्चात, ती एका विचित्र अवयव असलेल्या बालकास जन्म देते. या बालकाचे शरीर आठ ठिकाणी वाकडे असते, तसेच दिसायला ही हे बालक, कुरुप दिसणारे असते. याचे नावच "अष्टावक्र" असे ठेवण्यात येते.
बालक मोठा होत जातो, अभ्यास करतो, कष्ट घेतो. जाणत्या वयामध्ये, जेव्हा त्यास स्वतच्या पित्याविषयी व त्यांच्या जलसमाधी विषयी समजते, तेव्हा, अष्टावक्र स्वतच्या मातेस व आजोबा, उद्दालक मुनि यांची परवानगे घेऊन व श्वेतक्केतुस सोबत घेउन, जनक राजाकडे येतो. जनक राजा, तसेच दरबारातील, अनेक लोक त्या विकलांग तरुण साधकाकडे चेष्टेने पाहुन त्यावर हसतात. त्यावेळी अष्टावक्र म्हणतो, माणसाची ओळख त्याच्या वय व दिसण्यावरुन नसते, तर त्याच्या बुध्दीवरुन असते. असे म्हणुन तो, बंधी ऋषिस वादविवादासाठी आव्हान देतो. त्यांची चर्चा, वादविवाद, सलग सात दिवस सुरु असतो. अखेरीस, बंधी ऋषिंना हार मान्य करावी लागते. वादविवादाच्या शर्ती नुसार, बंधी ज्यावेली जलसमाधीसाठी नदीत उतरतात, त्यावेळी अष्टावक्र, त्यांना तासे करण्यापासुन परावृत्त करतो. या सगळ्या प्रकाराने राजा जनक अत्यंत प्रभावित होऊन, अष्टावक्रास गुरुस्थान अर्पित करतो. त्यानंतर जनक आणि अष्टावक्र ऋषि यांमध्ये जो संवाद झाला आहे तो म्हनजेच
"अष्टावक्र गीता" होय.

Tuesday, November 15, 2016

आम्ही सुध्दा हिन्दुच आहोत..


स्मशाणात स्मशाण शांतता होती. मुख्य स्मशान मंडपाच्या बाहेर असलेल्यांमध्ये थोडी कुजबुज सुरु होती. मांमाच्या मुलाने उलटा हात करुन बोंब मारली. आणि  अंतविधीच्या जळणा-या सरणाशेजारीच उभ्या उभ्या एक जण बोलु लागला. मरणाच्या वाटेवर देखील लोक बोलतात हे माहीत होते व असे बोलणे ऐकण्याची व बोलणा-याची किव येते नेहमीच. पण आज हा जो माणुस बोलु लागला तस तसे कान अधिक सतर्क होत गेले व त्याचा शब्दनशब्द झेलण्याचा प्रयत्न करु लागले. वक्त्याने मामांविषयी बरीच माहीती सांगितली. त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय काय केले, किती त्याग केला, कशाप्रकारे "ह्या एकाम्ड्या शिलेदाराने" संघाचे काम तालुक्यात रुजवले व चांगली पीढी हाताशी येईपर्यंत ते टिकवले...सोबतच आणीवाणीच्या काळात कशापकारे मारुतराव वाल्हेकरांच्या ऐवजी "मला अटक करा" म्हणुन १९ महीने तुरुंगवास भोगला हे देखील या वक्त्याने सांगितले. पुढे तो जे बोलला ते मात्र अनपेक्षित व संघ कार्याची महत्ता, गौरव एका अनोख्या उंचीवर नेऊन ठेवणारे होते. शब्दशः नाही पण सार पुढील प्रमाणे आहे..ते असे , "आम्ही मुसलमान असलो तरीही आधी आम्ही हिन्दु आहोत, व मामांनी आम्हाला आमच्या हिन्दुत्वाची जाणीव करुन दिली"...  हा जो वक्ता होता त्याचे नाव त्याने सांगितले ते असे " मुनीरभाई मुलाणी"..
स्मशानभुमीतील अंत्यविधीच्या वेळी एका निष्टावंत संघकार्यकर्त्याच्या शोकसभेची सुरुवात मुनीरभाईंच्या भाषणाने झाली होती. मुनीर भाईंनंतर देखील बरेच वक्ते बोलले. सगळ्यांनी आपापल्या परीने मामांच्या जीवनाचा, आदर्शाचा गौरव केला, शेवटी संघाचे प्रांत प्रचारक अतुल लिमये हे देखील बोलले. पण बाकी कोण काय बोलले याकडे लक्ष गेलेच नाही, कारण मुनीरभाईंनी उच्चारलेले "आम्ही हिन्दुच आहो"  हे वाक्यच सतत घुमत राहीले.
अगदी घरी, नंतर ऑफीस, रात्री झोपेपर्यंत तेच वाक्य तेच शब्द..आणि प्रश्न की मामांनी हे कसे काय साधले?

श्री गुरुजींचे "विचारधन" म्हणजे संघाची वैचारीक बैठक म्हणता येईल. किंबहुना संघाची विचारधारा गुरुजींनी त्यांच्याकाळात शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केला तो या पुस्तकात. कालानुरुप संघसरीता वाहतेच आहे. सोबत अनेक चांगल्या गोष्टी घेत व कालबाह्य, अतार्कीक सोडुन देत, संघ अविरत कार्यरत आहे. कदाचित आता जर कुणी संघाची फिलोसॉफी लिहिण्यास सुरुवात केली तर "विचारधन" पेक्षा अनेक जास्त मुद्दे जे सामाजिक जीवनाच्या एकात्म विकासासाठी आवश्यक आहेत असे लिहिले जातील. म्हणजेच काय तर संघ परीवर्तनशील आहे व उत्क्रांतवादी आहे, काळानुरुप बदलास सदैव तत्पर आहे. असे असले तरी संघाचे मुळ कार्य , ध्येय, उद्दीष्ट जर कोणते असेल तर आहे, कार्यकर्ता घडवणे. व संघाने हे काम स्थापने पासुन अविरतपणे केले आहे. यात बदल नाही झाला व होणार देखील नाही. हिन्दुराष्ट्रवाद म्हणजे काय हे आजकाल च्या तथाकथित "रॅशनल" म्हणवुन घेणा-या पीढीला(त्यातही जन्माने हिन्दु असणा-यांना देखील) मोठे मोठे लेख, पुस्तके, लेक्चर्स देऊन समजणार नाही. स्वतःला हिन्दु म्हणवुन घेणे म्हणजे प्र्तिगामी वाटावे इतपत हिन्दुत्वाची लाज आजकाल तरुणांना वाटते. पण मामांनी जवळ जवळ ५० वर्षापुर्वी कोणत्या निष्टेने स्वतःस संघकार्यास वाहुन घेतले असेल की जेणे करुन "हिन्दुराष्ट्रवाद" ते एका मुसलमानास समजावु सांगु शकले.
मी मामांना १८ वर्षांपासुन ओळखतो आहे. वेगवेगळ्या वर्गांत, शिबिरांत मामा नेहमी उपस्थित असायचे. पण मामांनी कधी भाषण केलेले मला आठवत नाही. हो गप्पा खुप मारायचे. मागच्या एक दोन वर्षात मामांची गाठ घेता आली नाही. पुर्वी पौड ला गेलो की आवर्जुन मामांना भेटायला त्यांच्या घरी जाणे ठरलेलेच. मामांप्रमाणेच घरचे बाकी सदस्य देखील मायाळु व अगत्याने पाहुणचार करणारे आहेत. मामा नेहमीच्या त्यांच्या जागी काहीतरी लिहित असायचे किंवा काहीतरी कारीगरीचे काम करीत असायचे. मामांना मोडी लिपीचे ज्ञान होते, त्यामुळे दुरदुरुन लोक जुने कागदपत्र घेऊन त्यांचे कडे येत मराठीत भांषांतरासाठी. मामा देव सुध्दा बनवीत. देवाचे टाक मांमांच्या इतके सुबक, रेखीव तालुक्यात अन्य कुणीच बनवीत नाही. माझ्या घरचे टाक देखील मामांनीच बनवले आहेत. तर मामांकडे गेले की एकीकडे हातातील काम न थांबवता ते आल्या गेलेल्यांशी मनमोकळे पणाने गप्पा मारीत. मी अनेकदा गेलोय त्यांच्याकडे, पण त्यांनी कधी "संघाचे काम कर" असा उपदेश केला नाही. संघाचे काम ईश्वरी काम आहे असे त्यांना भेटुन, त्यांना पाहुन नेहमीच वाटले.

स्वच्छ वैयक्तिक जीवन, पारदर्शी सामाजिक जीवन, सत्य ,अस्तेय,  अपरीग्रह असे अनेक पैलु त्यांच्या व्यक्तित्वाचा अतुट भाग होते. "इदं न मम" या भावनेने जे जे अर्जित केले ते ते "राष्ट्राय स्वाहा" कसे करावे याचे उदाहरण म्हणजे आमचे कैलासवासी मामा शेरेकर. याच सदगुणाच्या जोडीने माझ्यासारख्या अनेकांवर कायमचा राष्ट्रभक्तीचा संस्कार करणारे मामा शेरेकर एका मुसलमान माणसास देखील भावतात हे सर्वात मोठे आश्चर्य. नुसतेच भावलेले नाही मामा, तर संघाचा जो राष्ट्रवाद आहे तो त्यांच्या आयुष्यात जसाच्या तसा अवतरीत झाले, प्रकट झालेला दिसतो. आजकाल जिथ भारतीयांना स्वतःला "हिन्दु" म्हणवुन घेण्याची लाज वाटते आहे, तिथे एका मुस्लीम व्यक्तिने दिवंगत मामांच्या शोकसभेत मामांविषयी व स्वतःया "हिन्दु" असण्याविषयी काढलेल्या उद्गाराने मामांच्या जीवनाचे सार्थक झाले हेच म्हणावेसे वाटते.

स्वतःच्या गुणकर्माने मामांनी नक्कीच परलोकी स्वतसाठी योग्य ती "गती" मिळवली असेलच. त्यामुळे ह्या पुण्यात्म्यासाठी माझ्यासारख्या पामराने प्रार्थना करावी इतका मी मोठा नक्कीच नाही. पण त्यांच्याकडुन , त्यांच्या जीवनाकडुन आमच्या सारख्या अनेकांना हा राष्ट्रभक्तीचा वारसा, प्रेरणा, स्फुर्ती सदोदीत मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

नतमस्तक
हेमंत सिताराम ववले