Showing posts with label Hindutva. Show all posts
Showing posts with label Hindutva. Show all posts

Tuesday, November 15, 2016

आम्ही सुध्दा हिन्दुच आहोत..


स्मशाणात स्मशाण शांतता होती. मुख्य स्मशान मंडपाच्या बाहेर असलेल्यांमध्ये थोडी कुजबुज सुरु होती. मांमाच्या मुलाने उलटा हात करुन बोंब मारली. आणि  अंतविधीच्या जळणा-या सरणाशेजारीच उभ्या उभ्या एक जण बोलु लागला. मरणाच्या वाटेवर देखील लोक बोलतात हे माहीत होते व असे बोलणे ऐकण्याची व बोलणा-याची किव येते नेहमीच. पण आज हा जो माणुस बोलु लागला तस तसे कान अधिक सतर्क होत गेले व त्याचा शब्दनशब्द झेलण्याचा प्रयत्न करु लागले. वक्त्याने मामांविषयी बरीच माहीती सांगितली. त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय काय केले, किती त्याग केला, कशाप्रकारे "ह्या एकाम्ड्या शिलेदाराने" संघाचे काम तालुक्यात रुजवले व चांगली पीढी हाताशी येईपर्यंत ते टिकवले...सोबतच आणीवाणीच्या काळात कशापकारे मारुतराव वाल्हेकरांच्या ऐवजी "मला अटक करा" म्हणुन १९ महीने तुरुंगवास भोगला हे देखील या वक्त्याने सांगितले. पुढे तो जे बोलला ते मात्र अनपेक्षित व संघ कार्याची महत्ता, गौरव एका अनोख्या उंचीवर नेऊन ठेवणारे होते. शब्दशः नाही पण सार पुढील प्रमाणे आहे..ते असे , "आम्ही मुसलमान असलो तरीही आधी आम्ही हिन्दु आहोत, व मामांनी आम्हाला आमच्या हिन्दुत्वाची जाणीव करुन दिली"...  हा जो वक्ता होता त्याचे नाव त्याने सांगितले ते असे " मुनीरभाई मुलाणी"..
स्मशानभुमीतील अंत्यविधीच्या वेळी एका निष्टावंत संघकार्यकर्त्याच्या शोकसभेची सुरुवात मुनीरभाईंच्या भाषणाने झाली होती. मुनीर भाईंनंतर देखील बरेच वक्ते बोलले. सगळ्यांनी आपापल्या परीने मामांच्या जीवनाचा, आदर्शाचा गौरव केला, शेवटी संघाचे प्रांत प्रचारक अतुल लिमये हे देखील बोलले. पण बाकी कोण काय बोलले याकडे लक्ष गेलेच नाही, कारण मुनीरभाईंनी उच्चारलेले "आम्ही हिन्दुच आहो"  हे वाक्यच सतत घुमत राहीले.
अगदी घरी, नंतर ऑफीस, रात्री झोपेपर्यंत तेच वाक्य तेच शब्द..आणि प्रश्न की मामांनी हे कसे काय साधले?

श्री गुरुजींचे "विचारधन" म्हणजे संघाची वैचारीक बैठक म्हणता येईल. किंबहुना संघाची विचारधारा गुरुजींनी त्यांच्याकाळात शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केला तो या पुस्तकात. कालानुरुप संघसरीता वाहतेच आहे. सोबत अनेक चांगल्या गोष्टी घेत व कालबाह्य, अतार्कीक सोडुन देत, संघ अविरत कार्यरत आहे. कदाचित आता जर कुणी संघाची फिलोसॉफी लिहिण्यास सुरुवात केली तर "विचारधन" पेक्षा अनेक जास्त मुद्दे जे सामाजिक जीवनाच्या एकात्म विकासासाठी आवश्यक आहेत असे लिहिले जातील. म्हणजेच काय तर संघ परीवर्तनशील आहे व उत्क्रांतवादी आहे, काळानुरुप बदलास सदैव तत्पर आहे. असे असले तरी संघाचे मुळ कार्य , ध्येय, उद्दीष्ट जर कोणते असेल तर आहे, कार्यकर्ता घडवणे. व संघाने हे काम स्थापने पासुन अविरतपणे केले आहे. यात बदल नाही झाला व होणार देखील नाही. हिन्दुराष्ट्रवाद म्हणजे काय हे आजकाल च्या तथाकथित "रॅशनल" म्हणवुन घेणा-या पीढीला(त्यातही जन्माने हिन्दु असणा-यांना देखील) मोठे मोठे लेख, पुस्तके, लेक्चर्स देऊन समजणार नाही. स्वतःला हिन्दु म्हणवुन घेणे म्हणजे प्र्तिगामी वाटावे इतपत हिन्दुत्वाची लाज आजकाल तरुणांना वाटते. पण मामांनी जवळ जवळ ५० वर्षापुर्वी कोणत्या निष्टेने स्वतःस संघकार्यास वाहुन घेतले असेल की जेणे करुन "हिन्दुराष्ट्रवाद" ते एका मुसलमानास समजावु सांगु शकले.
मी मामांना १८ वर्षांपासुन ओळखतो आहे. वेगवेगळ्या वर्गांत, शिबिरांत मामा नेहमी उपस्थित असायचे. पण मामांनी कधी भाषण केलेले मला आठवत नाही. हो गप्पा खुप मारायचे. मागच्या एक दोन वर्षात मामांची गाठ घेता आली नाही. पुर्वी पौड ला गेलो की आवर्जुन मामांना भेटायला त्यांच्या घरी जाणे ठरलेलेच. मामांप्रमाणेच घरचे बाकी सदस्य देखील मायाळु व अगत्याने पाहुणचार करणारे आहेत. मामा नेहमीच्या त्यांच्या जागी काहीतरी लिहित असायचे किंवा काहीतरी कारीगरीचे काम करीत असायचे. मामांना मोडी लिपीचे ज्ञान होते, त्यामुळे दुरदुरुन लोक जुने कागदपत्र घेऊन त्यांचे कडे येत मराठीत भांषांतरासाठी. मामा देव सुध्दा बनवीत. देवाचे टाक मांमांच्या इतके सुबक, रेखीव तालुक्यात अन्य कुणीच बनवीत नाही. माझ्या घरचे टाक देखील मामांनीच बनवले आहेत. तर मामांकडे गेले की एकीकडे हातातील काम न थांबवता ते आल्या गेलेल्यांशी मनमोकळे पणाने गप्पा मारीत. मी अनेकदा गेलोय त्यांच्याकडे, पण त्यांनी कधी "संघाचे काम कर" असा उपदेश केला नाही. संघाचे काम ईश्वरी काम आहे असे त्यांना भेटुन, त्यांना पाहुन नेहमीच वाटले.

स्वच्छ वैयक्तिक जीवन, पारदर्शी सामाजिक जीवन, सत्य ,अस्तेय,  अपरीग्रह असे अनेक पैलु त्यांच्या व्यक्तित्वाचा अतुट भाग होते. "इदं न मम" या भावनेने जे जे अर्जित केले ते ते "राष्ट्राय स्वाहा" कसे करावे याचे उदाहरण म्हणजे आमचे कैलासवासी मामा शेरेकर. याच सदगुणाच्या जोडीने माझ्यासारख्या अनेकांवर कायमचा राष्ट्रभक्तीचा संस्कार करणारे मामा शेरेकर एका मुसलमान माणसास देखील भावतात हे सर्वात मोठे आश्चर्य. नुसतेच भावलेले नाही मामा, तर संघाचा जो राष्ट्रवाद आहे तो त्यांच्या आयुष्यात जसाच्या तसा अवतरीत झाले, प्रकट झालेला दिसतो. आजकाल जिथ भारतीयांना स्वतःला "हिन्दु" म्हणवुन घेण्याची लाज वाटते आहे, तिथे एका मुस्लीम व्यक्तिने दिवंगत मामांच्या शोकसभेत मामांविषयी व स्वतःया "हिन्दु" असण्याविषयी काढलेल्या उद्गाराने मामांच्या जीवनाचे सार्थक झाले हेच म्हणावेसे वाटते.

स्वतःच्या गुणकर्माने मामांनी नक्कीच परलोकी स्वतसाठी योग्य ती "गती" मिळवली असेलच. त्यामुळे ह्या पुण्यात्म्यासाठी माझ्यासारख्या पामराने प्रार्थना करावी इतका मी मोठा नक्कीच नाही. पण त्यांच्याकडुन , त्यांच्या जीवनाकडुन आमच्या सारख्या अनेकांना हा राष्ट्रभक्तीचा वारसा, प्रेरणा, स्फुर्ती सदोदीत मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

नतमस्तक
हेमंत सिताराम ववले


Friday, November 11, 2016

हिन्दुत्व पुन्हा एकदा

हिन्दु , हिन्दुत्व पुन्हा एकदा.


नुकत्याच लंडन मध्ये झालेल्या हिन्दु स्वयंसेवक संघाच्या महाशिबिरात, संघाचे सरसंघचालक, मोहन जी भागवत, यांनी केलेल्या विधानाचा विपर्यास करुन, अर्थाची ओढाताण करुन प्रसिध्दी माध्यमांनी चुकीच्या मथळ्याखाली बातम्या दिल्या..त्या पार्श्वभुमीवर, हिन्दु, हिन्दुत्व म्हणजे नेमके काय याचा मागोवा थोडक्यात घेण्याचा हा प्रयत्न. आशा आहे खालील विवेचन वाचुन हिन्दु, हिन्दुत्वा विषयी असलेले गैरसमज दुर होतील..फक्त वाचकाने पुर्वग्रह बाजुला ठेवुन वाचावे हि विनंती...

मुळात हिन्दुत्वाला इतर सांप्रदायांच्या चष्म्यातुन पाहील्यामुळे (म्हणजेच इतर "त्व" शी तुलना केल्यने ) हिन्दुत्वामध्ये दोष दिसत आहेत. व स्वाभाविक ही आहे. कारण कोणत्याही विचारसरणीचा मुळातुन अभ्यास न केल्याने व ऐकीव व पुर्वग्रह दुषित माहीती च्या आधारे हिन्दुत्वा कडे पाहिल्यास हिन्दुत्व म्हणजे "विरोध" असेच वाटते. व असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी हिन्दु म्हणजे काय हे समजले तरच हिन्दुत्व म्हणजे काय हे समजेल. मुळात हिन्दु म्हणजे जो अर्थ संघाला अभिप्रेत आहे तोच सांप्रदायिक नाही. तर हिन्दु हे संबोधन आसेतु हिमाचल पर्यन्त राहणा-या, या भुमीतील थोर पुरुर्षांना राष्ट्रपुरुष मानणा-या, या भुमीस वत्सला "मातृभुमी" मानणा-या, येथील समस्त लोकांचे राष्ट्रीय मानक आहे. राष्ट्रीय मानक म्हणताना मला हे ही स्पष्ट करावे लागेल की राष्ट्र म्हणजे राज्य नव्हे. राष्ट्र हे राज्यांच्या सीमांच्या ही पलीकडे असु शकते, नव्हे आहे. राष्ट्र भावने मुळे "राज्यात" एकात्म भाव निर्माण होतो व सद्भाव वाढीस लागुन लोकांचा , राज्याचा पर्यायाने राष्ट्राचा अभ्युदय होतो. त्यामुळे "हिन्दु" हा शब्द जाती, पंथ वाचक नसुन तो भारतीय उपखंडातील बहुसंख्य नव्हे सर्वच लोकांसाठी वापरलेला भुगोलीय तसेच संस्कृतीवाचक शब्द आहे...या संस्कृतीमध्ये भुमीला माता, नदीला माता मानले , तसेच सृष्टीतील चराचरास "सहचर" असे शिकविले. याच संस्कृतीने "वसुधैव कुटुंबकम" चे ब्रीद दिले., याच संस्कृतीने वेद दिले, उपनिषदे दिली. याच संस्कृतीने राम कृष्ण दिले, तसेच १९ व्य शतकापर्यन्त जगातील सर्वात जास्त अनुसरला जाणारे बौध्द मत की ज्याने शतकापुर्वी पर्यन्त जगाच्या लोकसंख्येचा २/३ भाग व्यापला होता, व तो ही कसल्याही बलाचा किंवा छलाचा वापर न करता दिला. याच संस्कृतीने गणित,खगोलशास्र्त,बीजगणितात मोलाचे योगदान दिले, अजुनही बरेच आहे लिहिण्यासारखे..तर ही आहे हिन्दु संस्कृती. या हिन्दु संस्कृती चे पाईक अगदी सगळेच आहे, तिचे अनुसरण करणारे आहेत, ती कालौघात नीट न समजावली गेल्यामुळे "सृष्टीचे दोहन" ऐवजी आजकाल सृष्टीचे "शोषण" करणारे "हिन्दु" सुध्दा आहेत. एकाच घरात वेगवेगळ्या देवांची पुजा करणारे व्यक्ति आहेत, कुणी देवीची, कुणी पांडुरंगाची, कुणी शिवा ची, तर कुणी मारुतीची पुजा करतात. पण असे वेगवेगळ्या देवांची पुजा करणारे एकाच घरातील लोक कधी भांडत नाहीत, की मी ज्या देवतेची पुजा करतो ती देवताच श्रेष्ट व तुझी कनिष्ट असा अट्टाहास करीत नाहीत. तरीही ते हिन्दु आहेत. जे एका घराचे हे तसे एका राष्ट्राचे ही होते व पुन्ह तसे घडवता देखील येईल. नुसते तेच नाही, तर "देव" नावाची कल्पनाच न माणणारे चार्वाक सुध्दा महर्षीच आहेत. आस्तिक असणे किंवा नास्तिक असणे, किंवा निश्रेयसाची प्राप्ती कशी करुन घ्यावी हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत निर्णय असावा, त्यानुसार प्र्त्येकास हे "उपासना" स्वातंत्र्य याच संस्कृतीने दिले. कालौघात यात काही अनिष्ट प्रथा केवळ व्यक्तिगत स्वार्थापोटी घुसल्या , घुसवल्या गेल्या, तसेच काही प्रथांचा पाश्चात्यांनी केवळ राज्यकांक्षेने "फोडा व राज्य करा" गवगवा केला. त्यामुळे साहजिकच या प्रथांविषयी तिरस्कार निर्माण होण्याऐवजी "हिन्दु" संस्कृती विषयीच तिरस्कार निर्माण झाला. तसेच इंग्रजांनी केलेल्या "रीलीजन" या शब्दाच्या हिन्दी भाषांतराने देखील आणखी जास्त फुट पडली. रीलीजन शब्दा्चा समानार्थी किंवा जवळच्या अर्थाचा शब्द "धर्म" नसुन "पंथ" आहे. भारतीय दर्शन शास्त्राप्रमाणे जैन एक पंथ आहे पण रीलीजन च्या चुकीच्या भाषांतरामुळे तो एक "धर्म" झाला. पंथ अनेक आहेत. व प्रत्येक पंथ व्यक्तिस पारलौकीक तसेच इहलौकीक सुखासाठी मार्गदर्शन करतो. यात कोणता तरी एक पंथ परीपुर्ण आहे असे नाही, हे पंथ कोण्या एका व्यक्तिच्या आध्यात्मिक अनुभवातुन निर्माण झालेले असल्याने त्यात भेद असु शकतात. त्यामुळे ज्याप्रमाणे सर्व पंथ कुणी ना कुणी तयार केले किंवा कुणाच्या ना कुणाच्या प्रेरणेने रचले गेले, तसे "हिन्दु" हा पंथ नसल्याने यास कुणीतरी "एक" व्यक्ति निर्माणकर्ता नाही. म्हणजेच हिन्दु हा पंथ नाही, तर हिन्दु ही एक संस्कृती असुन ती हजारो लाखो करोडों लोकांच्या योगदानातुन निर्माण झाली आहे...तर ही जी हिन्दु संस्कृती आहे तिच्या विषयी कुणालाच काहीही वावडे नाही. सर्वांना ती आवडते, महान वाटते, तिलाच "भारतीय" संस्कृती" असेही म्हणुन आजही जगभारातील अभ्यासु, आपल्या कडे आकर्शित होत आहेत. कारण ही संस्कृती "सर्वेषाम अविरोधेन" आहे. 

पण मग प्रश्न येतो की काही लोकांना "हिन्दुत्व" म्हंटले की सांप्रदायिक,संकुचित, जातीयवादी असे का वाटावे? नुकतेच एका मित्राने फेसबुक वर नेमके स्टेट्स लिहिले होते..Hindutva is Hinduism with resistance...हिन्दुत्व म्हणजे हिन्दु व प्रतिकार यांची बेरीज. प्रतिकार ? कुणाचा? कशाचा? कशाप्रकारे? हिन्दुत्व प्रतिकाराच्या गरजेतुन जन्माला आले आहे...आपल्या धारणांवर झालेल्या हल्ल्यांचा प्रतिकार, सांस्कृतिक हल्ल्यांचा प्रतिकार, वैचारिक हल्ल्यांचा प्रतिकार, हिन्दुंच्या सुरु असलेल्या बुध्दीभेदाचा प्रतिकार, इतर पंथांच्या छल आणिअ बल पुर्वक सुरु असलेल्या विस्तारवादाचा प्रतिकार, या भुमी तील पुजनीय , गर्हनीय अशा सांस्कृतिक प्रतीकांवर सुरु असलेल्या हल्ल्यांचा प्रतिकार, पंथीय कट्टरतेचा प्रतिकार...हिन्दुत्व म्हणजे प्रतिकार.....त्यामुळे प्रतिकार करण्यासाठी कारणीभुत असलेल्या वर नमुद केलेल्या गोष्टी, षडयंत्रे थांबली म्हणजे "हिन्दुत्व" सुध्दा संपेल... माझ्या मर्यादीत बुध्दीला शोभेल असच लिहिण्याचा बाष्कळ प्रयत्न केला आहे...त्रुटी असतील तर त्या माझ्या..योग्य जे असेल ते या संस्कृतीचे. सुधारणेला अजुनही जागा आहे असे मी मानतो, तर्क, बुध्दी, विज्ञान यांच्यावर आधारीत आपली सभ्यता आपण आणखी महान करु शकतो. 
अस्तु.
हेमंत ववले.