Friday, June 2, 2017

लवासा, सत्ताधारी व जनता


लवासा च्या २०१६ च्या ताळेबंद मध्ये लवासाची एकुण मिळकत (असेट्स) ३२८७०१.७५ लक्ष रुपये एवढी दाखविली आहे. हा आकडा लाखांत आहे. नीट समजुन घ्या, ३२८७०१.७५ लाख आहेत हे, ३ लाख नव्हे. म्हणजे ३,२८,७०,१०,७५,०००/- (तीनशे अठ्ठावीस अब्ज रुपये)रुपये एवढी एकुण मिळकत.(बर हा जाहीस केलेला आकडा आहे. जाहीर न केलेला खरा आकडा यापेक्षा चार पट जास्तच असेल)
लवासा कुणाच्या छत्रछायेखाली तयार झाले, व पडद्यामागचे खरे धनी कोण आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. लवासाचा उद्य आणि विकास मागील १५ ते १७ वर्षात झालेला आहे. ज्या दुरदर्शी लोकांनी हे स्वप्न पाहीले व ते सत्यात उतरवले त्या लोकांस मानले पाहीजे.
आता गम्मत पहा...कॉन्ग्रेस गेली ७० वर्षे देशात व राज्यात सत्तेवर आहे, तर राष्ट्रवादी गेली १५ वर्षे पेक्षा जास्त काळ सत्तेत होती. या जनप्रतिनिधींना लवासास कर्ज, ना हरकत प्रमाणपत्रे, परवानग्या इत्यादी देता आले तसेच सत्ताधा-यांपैकी काहींचे शेयर्स देखील लवासामध्ये आहेत.
लवासा इतके मोठे होते, आर्थिक नफ्याचे नवनवीन टप्पे गाठते, तर त्याच सत्ताधा-यांना, शेतक-यांसाठी शेतीआधारीत उद्योग, लघुउद्योग, सुक्ष्म उद्योग आदी का करता येऊ नये?
केवळ नफेखोरी व स्वतःची व स्वतःच्या नातेवाईकांची घरे भरण्यासाठी यांनी सरकार चालवले अर्धशतकाहुन ही जास्त काळ. शेतकरीच नाही, तर कुशल अकुशल बलुतेदार, मजुर, भुमीहीन, अल्पभुधारक यांचा विचार फक्त कागदावरच राखीव जांगासाठीच केला गेला, व भोळी जनता आरक्षणाच्या प्रलोभनास बळी पडली.
वर्तमान सरकारला जर जनतेसाठी खरच काही करावयचे असेल तर, उद्योजकता विकसित करण्यावर अधिक भर दिला पाहीजे. मागणी आणि पुरवठ्याचे तंत्र समजुन स्थानिक पातळीवर विविध उत्पादने तयार करण्याचे कुटीरोद्योग गावोगाव निर्माण होतील याकडे लक्ष देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी लागेल.
तसेच स्वतःस पुढारी म्हणवुन घेणारे, वाढदिवसाची बॅनर बाजी करणा-यांनी स्वतस एक प्रश्न विचारुन पहा, की तुमच्या मुळे असे किती कुटीरोद्योग निर्माण झाले व किती लोकांस रोजगार मिळाला?
स्वतःची पोळी भाजुन घेण्यात अधिक रस असल्याने मागील सत्ताधा-यांना समस्येचे नीटसे आकलन झालेच नाही. लोकनेत्यांनी, तथाकथित जाणत्या राजाने, दादाने, ताईने स्वतःचे हजारो क्लोन निर्माण केले त्यामुळे ह्या क्लोनांना त्यांच्या मुळ प्रतींमध्ये दोष दिसणार नाहीच, तसेच हे क्लोन जनसामान्यांमध्ये इतके खोलवर रुतलेले आहेत की तळागाळात देखील ह्या मुळ, ओरीजीनल नेत्यांच्या अवगुणांनी भरलेले कार्यकर्ते अजुनही समाजात विष कालवण्याचे काम इमानेइतबारे करीत आहेत.
एखादा शेतकरी जो अपार कष्टाने पीक घेतो, जेव्हा त्याने घेतलेले पीक जेव्हा मळनी ला अथवा काढणीला येते , व शिवारात वा-यावर डोलते, धान्याच्या छोट्याअ का होईना पण राशी तयार होतात, तेव्हा शेतक-याच्या चेह-यावर एक अवर्णनीय असा आमोद व हृद्यात उचंबळणा-या पुर्णत्वाच्या भावनाच सगळ काही देऊन जातात. तो शेतकरी त्याचे ते पीक, भाजीपाला रस्त्यावर फेकुन देईल? कदापि शक्य नाही. आणि जर कोणी देतच असेल तर समजा की तो शेतकरी नाहीच. त्याच्यासाठी शेती ही फक्त एक मशीन आहे. पण आपला शेतकरी ह्या शेतीस काळी आई म्हणतो. ह्या काळ्या आईने दिलेले जोंधळे शिरोधारी घेऊन, त्याचा यथोचित आदर, पुजा करुनच शेतकरी स्वत हे धनधान्य खातो किंवा इतरांस देतो. शेतक-यासाठी त्याने पिकविलेले धान्य म्हणजे त्याच्यासाठी पृथ्वीमातेने दिलेला प्रसादच असतो. तर असा अमुल्य ठेवा रस्त्यावर फेकणारा शेतकरी असुच शकत नाही.
बदलत्या काळानुसार मुल्य अदलाबदलीची पध्दत बदलली असली तरी डोलणारे शिवार व धान्याची रास यातुन जे आत्मिक समाधान शेतक-यास मिळते ते अन्य कशातच नाही.
काळ बदलला असला, पिक, धान्य भाजीपाला, याची किंमत रुपया पैश्यामध्ये व्हायला लागली तरीही शेतक-यासाठी त्याचे पीक स्वर्गसुखाहुन ही श्रेष्ट होते व आहेच.
त्यामुळे दुध , फळे , भाजीवाला इत्यादी,(मग ते स्वतःचे असो वा नसो), रस्त्यावर फेकणारा शेतकरी असुच शकत नाही. हे नक्कीच त्या ऐहीक स्वार्थाने बरबटलेल्या नेत्यांचे क्लोन आहेत, हे नीटसे समजा.
मुद्दा हा आहे की, मागणी आणि पुरवठ्याचे तंत्रावर आधारीत, स्थानिक पातळीवर लागणा-या वस्तुंचे उत्पादन स्थानिक पातळीवरच करणे व अधिकचे बाहेर विक्रीसाठी पाठवणे. व त्याद्वारे, शेती-आधारीत कुटीरोद्योग, गृहोद्योगाचे जाळे निर्माण करणे अतिशय गरजेचे आहे. लवासा सारखे उद्योग १५ वर्षात एवढी मालमत्ता व नफा कमावु शकतात तर, असे उद्योग(कुटीरोद्योग, गृहोद्योग, लघुउद्योग) , व्यापारी वृत्तीने , गावागावात का नाही केले जाऊ शकत. तर मित्रांनो, हे करता येणार असेल तर कसे, याबाबत चर्चा होऊ शकते काय?