Showing posts with label पंथ. Show all posts
Showing posts with label पंथ. Show all posts

Tuesday, November 14, 2017

फरक आहे की नाही?


मानवी मनास ह्या अपरंपार सृष्टीच्या गुढतेची ओढ अगदी सनातन आहे. मनुष्यास प्रश्न पडतात म्हणुनच तो मनुष्य आहे अन्यथा तोही एक आहार-निद्रा-मैथुन यातच रमणारा आणखी एक जीव असाच असता. ह्या प्रश्न पडण्यामुळेच ज्ञानाची अनगनित क्षेत्रे खुली झालेली आहे. मग ते क्षेत्र कोणतेही असो. अगदी अध्यात्मापासुनन ते आधुनिक विज्ञानापर्यंत. व ही जी काही क्षेत्रे आहेत ती सगळीच्या सगळी मानवीच्या मनाच्या ह्या प्रश्न पडणा-या, चिकित्सक वृत्तीमुळे निर्माण झालेली आहेत.
याच चिकित्सक वृत्तीतुन विविध दर्शने मांडली गेली. ह्या दर्शनांमध्ये मानवी मुल्यांचे संकलन झालेले दिसते. याच परंपरेमध्ये भारतामध्ये अनेक सांप्रदाय गेली हजारो वर्षे उद्यास आलेले आपण पाहत आहोत. ह्या विविध सांप्रदायांमध्ये आचरण आणि मुल तत्व असे दोन्ही प्रकारचे भेद आहेत. प्रत्येक सांप्रदायाची स्वतची एक उपास्य देवता/देव आहे.
गेल्या १२०० वर्षांपासुन भारतात इस्लाम हा सांप्रदाय देखील वाढला. तो वाढण्याची कारणे सांप्रदायिक उच्च मुल्ये होती असे मुळीच नाही. इस्लाम भारतामध्ये वाढण्याचे मुख्य कारण होते तलवार. तलवारीच्या जोरावर जगभरात पसरलेला ह्या सांप्रदायाच्या अनुयायांनी भारतात देखील हिच पध्दती अवलंबीली.
सहाव्या शतकात वेद वेदांताला पुन्हा एकदा प्रस्थापित करणा-या आचार्य शंकराच्या जीवनातील एक प्रसंग या ठिकाणी सांगावासा वाटतो. त्यांच्या अल्पशा म्हणजे अवघ्या ३२ वर्षांच्या काळात त्यांनी अनेक महान कार्ये केली. भारतात अष्टदिशांना मठांची स्थापना करुन गणराज्यांमध्ये विभागलेल्या भारतास त्यांनी सांस्कृतिक एकराष्ट्रभावा मध्ये गुंफले. दरम्यान त्यांचा सामना एका बौध्द सांप्रदायाच्या एका उच्च अधिकारी व्यक्तिशी झाला (मला त्यांचे नाव आता स्मरत नाहीये) . त्या दोघांमध्ये अखंड सात दिवस वाद-विवाद , धर्मचर्चा सुरु होती. वेदांताला पुनरुज्जीवीत करण्याचे महत्कार्य करणा-या आचार्यांनी त्याअ बौध्द व्यक्तिस चर्चे मध्ये परास्त केले. त्यानंतर ती बौध्द व्यक्ति बौध्द मताचा त्याग करुन आचार्यांचे शिष्यत्व पत्करुन वैदीक परंपरेमध्ये आली. तर हे दोघेही महान असे बुध्दीजीवी होते. व तर्कशास्त्र व दर्शनशास्त्र या विषयांत तसेच धर्माचे जीवनातील स्थान या बाबतीतही ते अधिकारी होते. पण त्यांमध्ये अहंकार नव्हता. शंकराचार्य योग्य की ते बौध्द व्यक्ति योग्य असा चर्चेचा सुर नव्हता. चर्चा तत्वाधीन होती. हे तत्व मानवी जीवनास अधिक लाभदायक आहे की ते तत्व मानवी जीवनास अधिक लाभप्रद आहे या बाबतीत चर्चा होती. व ती व्यक्तिनिरपेक्ष होती. त्यामुळेच जे योग्य ते , बौध्द व्यक्तिने आत्मसात करुन वैदीक पंरंपरा स्वीकारली.
तर वरील प्रसंगावरुन आपणास हे दिसते की,  अगदी इस्लामचा जन्म होण्या अगोदर पर्यंत भारतात उपासना पध्दतीचे स्वातंत्र्य अगदी सर्वांना होते. व हि उपासना पध्दती जन्मावर आधारीत नसुन ती व्यक्तिच्या आकलन शक्तिवर व श्रध्देवर आधारीत होती. आजही आपण हेच पाहतोय भारतात. एकाच कुटुंबात अनेकविध देवतांची पुजा अर्चा करणारी अनेक मंडळी , अगदी एका छताखाली राहतात. यास काय म्हणावे? तर हे आहे साप्रदायिक सौहार्द.
बर आता हे साप्रदायोक सौहार्द आणखी खोलात जाऊन आपण पाहुयात. घरात मुलांना आवडणारे देव कोणते? तर गणपती व मारुती. बरोबर ना? बर आजपर्यंत आपण कधीतरी आपल्या मुलांना हे शिकवल्याचे आठवते आहे का, की गणपती आणि मारुती एकच आहेत. युवक किंवा प्रौढांचीए उपास्य देवता वेगळी असु शकते , किंवा एक ही असेल. पण देव देवता अनेक आहेत. व्यापाराच्या ठिकाणी आपण लक्ष्मीची पुजा करतो, व घरी कदाचित सगळेच्या सगळेच असतात किंवा, एखाद्याकडे एखादे दत्त मंदीर, किंवा विठ्ठल मंदीर ही असते देवघरात. इतके वैविध्य असताना आपण कधीही हे सगळे देव एकच आहेत असा अट्टाहास करीत नाही.
मग नेमके अल्ला आणि ईश्वर, असे शब्द द्वय आल्यावरच, हे दोघेही एकच आहेत असे भोंगळ तत्व कसे काय बरे सांगितले जाते. काही लोकांच्या मते हे दोघे ही, त्या एकाच परमात्म्याची दोन वेगळी रुपे आहेत. क्षणभर आपण असे मान्य जरी केले तरी, सामान्य माणसास,(बुध्दीजीवी नव्हे) ती परमतत्वाची भाषा कळत नसल्यानेच त्या परम तत्वाच्या अवनत रुपाची गरज निर्माण झाली. परम तत्व निराकार आहे, असे आपण समजु यात. सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, वगैरे, वगैरे… तर अशा निराकार अनंत अशा सत-चित-तत्वास समजुन घेण्याची सर्वांचीच कुवत नसल्याने प्रत्येकाने आपापल्या परीने , समजेल, रुचेल, प्रांत, वेश आवडेल अशा एखाद्या साकार रुपाची निर्मीती केली. ज्या लोकांनी ह्या साकार रुपाची निर्मीती केली आहे , त्यांच्या पक्षी त्यांनी निर्माण केलेले साकार रुप म्हणजेच सर्वकाही आहे. सर्वशक्तिमान कोण तर त्यांनी निर्माण केलेले रुप. त्या निर्माण करणा-यांच्या पक्षी साकाराच्या (शब्द-मुर्ती आदी द्वारे ज्याचे वर्णन करता येऊ शकते असे रुप) पलीकडे आणखी काहीही नाही.
माझ्यासारख्या माणसास जर विचारले की कोणता देव खरा आणि कोणता खोटा? किंवा कोणता देव त्या शब्दांच्या पलीकडे असलेल्या चिदानंद स्थितीचे प्रतिनिधीत्व चांगले करु शकतो? तर मी म्हणेन त्या सर्वात्म शक्तीची अभिव्यक्ति तर चराचरात होते आहे. मला कोणत्याही मुर्ती अथवा नावाची गरजच नाहीये. (सर्वम खलु इदं ब्रम्हं!!)
खंडण
१.      पण आपण ज्या दोन व्यक्तिरेखांविषयी बोलत आहोत त्या दोन व्यक्तिरेखा, दोन आहेत. ज्या अर्थी मी म्हणतोय , किंवा तुम्ही म्हणताय की त्या “दोन" आहेत त्या अर्थी त्या दोनच आहेत. एक नाहीत हे प्रथमदर्शनी सिध्द होते आहे.
२.      आधी सांगितल्या प्रमाणे आपण आपल्या मुलांना ज्याप्रमाणे गणपती आणि हनुमान एकच आहेत असे सांगण्याच्या फंदात पडत नाहीत तर ईश्वर आणि अल्ला एकच आहेत, हे शिकविण्याची घाई आपण का करतो. आपल्या मुलांस प्रश्न पडु द्या, त्यांना उत्तरे शोधु द्या, संशोधन करु द्या. का म्हणुन आपण स्वतस व पुढच्या पिढ्यांस अपंग बनवित आहोत. विचक्षण असणे हा देखील एक अमुल्य असा गुण विशेष आहे.
३.      तिसरे असे,, जर तुमचे म्हणणे असे आहे की त्या दोन असुन एकच आहेत तर, (तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा) तुमच्या इष्ट देवतेच्या जागी दुस-या देवाची उपासना कधीपासुन सुरु करताय ते सांगा? तुम्ही जर हिन्दु कुटंबात जन्मला असाल व तुमचे म्हणणे असेल की अल्ला आणि इश्वर हे एकच आहेत, तर तुम्ही कदाचित तुमच्या ह्या (नसलेल्या, जबरदस्तीने आणलेल्या) सांप्रदायिक सौहार्दाच्या हट्टाने प्रेटुन जाळीदार टोपी घालुन घरातच अल्लाची इबादत सुरु कराल देखील. पण तुम्ही असा एकतरी मुसलमान दाखवु शकाल का, की जो अल्लाची इबादत सोडुन आकंठ विठुरायाच्या भक्तिमध्ये बुडुन जाईल (दांडीया आणि गणपतीचे उदाहरण नको इथे देऊ कृपा करुन).
४.      आणखी असे, की आपण दोन्ही साप्रदायात ज्याप्रमाणे त्या दोन व्यक्तिरेखांचे वर्णन की गेले आहे, व हे केलेले वर्णन, त्या त्या सांप्रदायाच्या अनुयांयाना मान्य देखील आहे. तर ह्या वर्णनाच्या आधारावर, त्या त्या व्यक्तिरेखेच्या चरीत्रावर, उपदेशावर तुलनात्मक अभ्यास केला तर आपणास हे लगेच समजेल की ही दोन्ही व्यक्तित्वे भिन्न आहेत व ती भिन्न प्रकारचे आयुष्य जगली व भिन्न भिन्न उपदेश त्यांनी जगास दिले. मी जाणीव पुर्वक या दोन व्यक्तित्वापैकी एक श्रेष्ट व दुसरा दुष्ट असा भेद करण्याचा मोह टाळतो आहे. तो वाचकांनी करावा.
५.      आणखी एक महत्वाचा मुद्दा. एक बुध्दीजीवी म्हणुन एखाद मान्य करेल की दोघेही सारखेच आहेत किंवा एकच आहेत. कारण बुध्दीजीवी माणुस त्याच्याही पुढे जाऊन म्हणेल की ते दोघेच काय सगळी सृष्टीच एक सारखी आहे. यात भेद मुळीच नाही. कारण चराचरामध्ये एकच सामान्य तत्व आहे. विज्ञानवाद म्ह्णेल सगळ्यात अणुरेणू आहेत. सगळ्यांचे आकार भिन्न असले तरी मुलतः ते एकच आहेत. पण अल्ला आणि ईश्वर यास माणणारे लोक वैज्ञानिक नाहीत आणि बुध्दीजीवी देखील नाहीत. त्यांच्यासाठी सत्य हवे आहे. कि जे निखळ सत्य असेल. सुर्यासम प्रखर आणि तत्क्षणी योग्य-अयोग्य असा निर्णय करणारे. त्यामुळे ह्या दोन व्यक्तिरेखा एकच आहेत की भिन्न आहेत हे ठरविण्यासाठी आपणास त्या त्या व्यक्तिरेखांच्या अनुयायांच्या दृष्टीकोनातुन पहावे लागणार आहे. व मग आपण तटस्थ भुमिकेतुन, साकार रुपाच्या पार्श्वभुमीवर(च) याची पडताळणी करु शकतो.

पण जर सर्वात आधीचा जो परीच्छेद आहे, त्यात म्हंटल्याप्रमाणे, आपण जर आपल्यातील मुलभुत प्रवृतीचे (म्हणजे प्रश्न पडणे) दमन नाही केले, तर आपणास या दोन्ही व्यक्तित्वातील मधील भेद स्पष्ट दिसेल. 

Tuesday, January 31, 2017

ठेवा भारतीय दर्शनांचा


अष्टावक्र गीता

राजा जनक - चरीत्र दर्शन

रामायण, महाभारत वेदांत आदी ग्रंथांतुन राजा जनकाचा उल्लेख आहेच, तसेच काही पुराणामध्येदेखील राजा जनकाच्या चरीत्राचा उल्लेख आढळतो. बालपणापासुन टिव्ही, सिनेमा आदींतुन आपण जनकास फक्त एकाच व्यक्तिरेखेत पाहीलेले आहे, ते म्हणजे जानकीचा पिता. महादेवी सीता ही जनकाचीच पुत्री आहे व "जनक" या नावावरुनच तिचे नाव जानकी असे ही ठेवले गेले. २० वर्षापुर्वी ज्यांनी महाभारत मालीका टिव्हीवर पाहीली असेल त्यांना जर आठवत असेल तर त्यात दाखवलेला जनक एक हतबल "पिता" आहे असेच आपण आजपर्यंत मानतो आहोत. मालिका व सिनेमे भारतीय महापुरुषांच्या जीवन चरीत्रांना कधीच न्याय देऊ शकणार नाहीत. याला कारण ही तसेच आहे. एका व्यक्तिरेखेवर आपण लक्ष केंद्रीत करावयास गेलो तर त्या व्यक्तिरेखेच्या अनुशंगाने शेकडो व्यक्तिरेखा दृष्टीगोचर होतात. त्यामुळे दुरदर्शन वरील रामानंद सागर यांची मालिका म्हणजे "मर्यादापुरुषोत्तम श्रीराम" या एका व्यक्तिरेखेवर लक्ष केंद्रीत करुन तयार केलेली असल्याने, त्यात इतर पात्रांना तितकास न्याय देता आलेला नाही. असो.

जनक राजाचे वर्णन करताना उपरोक्त ग्रंथ त्याचा उल्लेख करताना अनेकविध विशेषणे वापरतात.
उदा - विदेही. म्हणजे ज्यास देह अहंकारापासुन सुटका प्राप्त असा तो म्हणजे विदेही. खरतर अध्यात्मात या स्तरापर्यंत पोहोचणे म्हणजे खुप मोठी उपलब्धी मानली जाती. देहाभिमान विसरला असा "वि"देही. जो "देह" नाही असा विदेही. अद्वैत मता मध्ये द्वैत नसतेच.  जनकास अद्वैत मताचा उपदेश अष्टावक्र मुनिकडुन झाला, पण जनकास "विदेही" हे विशेषन मात्र अष्टावक्र मुनिंची भेट होण्या आधीपासुनच लावले गेले आहे. सामान्य साधकास देहाभिमान, देहाहंकारापासुन सुटका करुन घेणे त्या अर्थाने सोपे आहे कारण त्याच्या मागे व्याप कमी असतात. पण एक प्रजाहित दक्ष राजा व तो देखील विदेही? हे समीकरण थोडे अजबच वाटते. असेच आश्चर्य व्यासपुत्र मुनि शुकास देखील वाटले व कुतुहलापोटी मेरु पर्वतापासुन म्हणजे त्याच्या निवासापासुन सलग तीन वर्षे पायी भ्रमण करीत मिथिला देशी पोहोचला होता. शुक आणि जनक हा देखील एक अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे. पुन्हा कधी तरी या विषयावर आपण चिंतन करुयात. तर एका राज्याचा कारभार पाहणारा एक व्यक्ति देखील "देहातीत" अवस्थेस पोहोचु शकतो. व हे केवळ भारतातच घडु शकते. बर त्याचे राज्य नुसते येरेगबाळे राज्य नव्हते, तर तेथील प्रजा अत्यंत सुखी व ज्ञानी देखील होती. रोजगार, रस्ते, पाणीव्यवस्थापन, संरक्षण, पर्यावरण आदी सर्वच अंगांनी राज्याची प्रगती इतकी झालेली की हजारो कोस दुरुन चिकित्सक(उदा -शुक मुनि) राज्य शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इथे येत. तर अशा राज्याचा राजा अध्यात्मात देखील प्रचंड गतिमान होता. इथे आवर्जुन एक उल्लेख करावासा वाटतो. तो म्हणजे तथागत भगवान बुध्द देवांचा. भारतीय संस्कृतीने दिलेल्या अनगणित अनमोल नररत्नांपैकी ही दोन रत्ने आहेत. एकाने राजविलास, राजवैभव या सर्वांचा त्याग करुन सलग सहा वर्षे तप करुन , गरजा कमी करुन , कमी अन्न, कमी पाणी, कमी बोलण, तपाच्या शेवटी शेवटीतर बोलणे बंदच, आदी प्रकारे तप करुन "विदेहावस्था" प्राप्त केली. म्हणजे शरीर म्हणजे मी नाही असा साक्षात्कार होणे, अनुभव होणे म्हणजेच विदेहावस्था होय. तर दुसरीकडे राजा जनक आहे, ज्याने राजपाट सांभाळता सांभाळता विदेहावस्थेस प्राप्त झाला. त्याने राजकारभार देखील केला व नुसताच केला नाही तर तो आदर्श केला व परमार्थ ही केला व तो देखील आदर्शच केला.
असो.
जिज्ञासुंनी जनकाचे चरीत्राचे अनुशीलन आणखी ही भिन्न प्रकारे करावे. अनेकविध पैलुंनी युक्त असा हा राजा अलौकिक होता. राजा असुनही योगी होता. राजा असुनही भक्त होता. राजा असुनही तर्कपंडीत होता. राजा असुनही कुशल योध्दा व परम प्रतापी होता. त्याच्या जीवनप्रवासात तो टप्प्याटप्प्याने उर्ध्वगामी गतीस प्राप्त होत होता.

त्यामुळेच भगवान श्रीकृष्णाच्या भगवदगीतेत ज्याप्रमाणे गुरु-शिष्य प्रश्नोत्तरे पाहायला मिळतात त्याप्रमाणे अष्टावक्रगीतेत प्रश्नोत्तरे नाहीत. अष्टावक्र गीतेत "संवाद" पाहावयास मिळतो. दोन अत्यंत बुध्दीमान, अधिकारी पुरुषांचा संवाद अष्टावक्र गीतेत अनुभवास येतो. अष्टावक्र गीता अद्वैत मतातील एक महान ग्रंथ आहे, मग त्या ग्रंथात वर्णन केलेला अद्वैतवाद या दोन व्यक्तिंच्या संवादात झळकणार नाही तरच नवल. इथे गुरु-शिष्य असे द्वैत नाही, हीच या अष्टावक्र गीतेची खुप मोठी उपलब्धी आहे.
टिप - अजुन ही इथे प्रत्यक्ष अष्टावक्र गीतेतील श्लोकांचा अर्थ , त्यावर विश्लेषण करण्याचे मी जाणीवपुर्वक टाळले आहे. जिज्ञासुंनी मुळातुनच या महान ग्रंथाचा अभ्यास करावा यासाठी असे केले आहे. परंतु, जर अष्टावक्र व जनक यांच्या चरीत्राचा अभ्यास असेल तर या गीतोपनिषदात शब्दबध्द केलेला "अद्वैतवाद" समजण्यास सुलभ होईल , अशा कारणाने त्रोटक रुपात जनकाच्या चरीत्राचा व त्याच्या व्यासंगाचा उल्लेख इथे केला आहे.

हेमंत सिताराम ववले.


Friday, May 6, 2016

"त्व" म्हणजे नेमके काय?

"त्व" म्हणजे नेमके काय?
मुळात हिन्दुत्वाला मुस्लीमत्वाच्या चष्म्यातुन पाहील्यामुळे (म्हणजेच इतर "त्व" शी तुलना केल्यने ) हिन्दुत्वामध्ये दोष दिसत आहेत. व स्वाभाविक ही आहे. कारण कोणत्याही विचारसरणीचा मुळातुन अभ्यास न केल्याने व ऐकीव व पुर्वग्रह दुषित माहीती च्या आधारे हिन्दुत्वा कडे पाहिल्यास हिन्दुत्व म्हणजे "विरोध" असेच वाटते. व असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी हिन्दु म्हणजे काय हे समजले तरच हिन्दुत्व म्हणजे काय हे समजेल. मुळात हिन्दु म्हणजे जो अर्थ संघाला अभिप्रेत आहे तोच सांप्रदायिक नाही. तर हिन्दु हे संबोधन आसेतु हिमाचल पर्यन्त राहणा-या, या भुमीतील थोर पुरुर्षांना राष्ट्रपुरुष मानणा-या, या भुमीस वत्सला "मातृभुमी" मानणा-या, येथील समस्त लोकांचे राष्ट्रीय मानक आहे. राष्ट्रीय मानक म्हणताना मला हे ही स्पष्ट करावे लागेल की राष्ट्र म्हणजे राज्य नव्हे. राष्ट्र हे राज्यांच्या सीमांच्या ही पलीकडे असु शकते. राष्ट्र भावने मुळे "राज्यात" एकात्म भाव निर्माण होतो व सद्भाव वाढीस लागुन लोकांचा , राज्याचा पर्यायाने राष्ट्राचा अभ्युदय होतो. त्यामुळे "हिन्दु" हा शब्द जाती, पंथ वाचक नसुन तो भारतीय उपखंडातील बहुसंख्य नव्हे सर्वच लोकांसाठी वापरलेला भुगोलीय तसेच संस्कृतीवाचक शब्द आहे...या संस्कृतीमध्ये भुमीला माता, नदीला माता मानले , तसेच सृष्टीतील चराचरास "सहचर" असे शिकविले. याच संस्कृतीने "वसुधैव कुटुंबकम" चे ब्रीद दिले., याच संस्कृतीने वेद दिले, उपनिषदे दिली. याच संस्कृतीने राम कृष्ण दिले, तसेच १९ व्य शतकापर्यन्त जगातील सर्वात जास्त अनुसरला जाणारे बौध्द मत की ज्याने शतकापुर्वी पर्यन्त जगाच्या लोकसंख्येचा २/३ भाग व्यापला होता, व तो ही कसल्याही बलाचा किंवा छलाचा वापर न करता, याच संस्कृतीने गणित,खगोलशास्र्त,बीजगणितात मोलाचे योगदान दिले, अजुनही बरेच आहे लिहिण्यासारखे..तर ही आहे हिन्दु संस्कृती. या हिन्दु संस्कृती चे पाईक अगदी सगळेच आहे, तिचे अनुसरण करणारे आहेत, ती कालौघात नीट न समजावली गेल्यामुळे "सृष्टीचे दोहन" ऐवजी आजकाल सृष्टीचे "शोषण" करणारे "हिन्दु" सुध्दा आहेत. एकाच घरात वेगवेगळ्या देवांची पुजा करणारे व्यक्ति आहेत, कुणी देवीची, कुणी पांडुरंगाची, कुणी शिवा ची, तर कुणी मारुतीची पुजा करतात. पण असे वेगवेगळ्या देवांची पुजा करणारे एकाच घरातील लोक कधी भांडत नाहीत, की मी ज्या देवतेची पुजा करतो ती देवताच श्रेष्ट व तुझी कनिष्ट असा अट्टाहास करीत नाहीत. तरीही ते हिन्दु आहेत. जे एका घराचे हे तसे एका राष्ट्राचे ही होते व पुन्ह तसे घडवता देखील येईल. नुसते तेच नाही, तर "देव" नावाची कल्पनाच न माणणारे चार्वाक सुध्दा महर्षीच आहेत. आस्तिक असणे किंवा नास्तिक असणे, किंवा निश्रेयसाची प्राप्ती कशी करुन घ्यावी हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत निर्णय असावा, त्यानुसार प्र्त्येकास हे "उपासना" स्वातंत्र्य याच संस्कृतीने दिले. कालौघात याच काही अनिष्ट प्रथा केवळ व्यक्तिगत स्वार्थापोटी घुसल्या , घुसवल्या गेल्या, तसेच काही प्रथांचा पाश्चात्यांनी केवळ राज्यकांक्षेने "फोडा व राज्य करा" गवगवा केला. त्यामुळे साहजिकच या प्रथांविषयी तिरस्कार निर्माण होण्याऐवजी "हिन्दु" संस्कृती विषयीच तिरस्कार निर्माण झाला. तसेच इंग्रजांनी केलेल्या "रीलीजन" या शब्दाच्या हिन्दी भाषांतराने देखील आणखी जास्त फुट पडली. रीलीजन शब्दा्चा समानार्थी किंवा जवळच्या अर्थाचा शब्द "धर्म" नसुन "पंथ" आहे. भारतीय दर्शन शास्त्राप्रमाणे जैन एक पंथ आहे पण रीलीजन च्या चुकीच्या भाषांतरामुळे तो एक "धर्म" झाला. पंथ अनेक आहेत. व प्रत्येक पंथ व्यक्तिस पारलौकीक तसेच इहलौकीक सुखासाठी मार्गदर्शन करतो. यात कोणता तरी एक पंथ परीपुर्ण आहे असे नाही, हे पंथ कोण्या एका व्यक्तिच्या आध्यात्मिक अनुभवातुन निर्माण झालेले असल्याने त्यात भेद असु शकतात. त्यामुळे ज्याप्रमाणे सर्व पंथ कुणी ना कुणी तयार केले किंवा कुणाच्या ना कुणाच्या प्रेरणेने रचले गेले, तसे "हिन्दु" हा पंथ नसल्याने यास कुणीतरी "एक" व्यक्ति निर्माणकर्ता नाही. म्हणजेच हिन्दु हा पंथ नाही, तर हिन्दु ही एक संस्कृती असुन ती हजारो लाखो लोकांच्या योगदानातुन निर्माण झाली आहे...तर ही जी हिन्दु संस्कृती आहे तिच्या विषयी कुणालाच काहीही वावडे नाही. सर्वांना ती आवडते, महान वाटते, तिलाच "भारतीय" संस्कृती" असेही म्हणुन आजही जगभारातील अभ्यासु, आपल्या कडे आकर्शित होत आहेत. कारण ही संस्कृती "सर्वेषाम अविरोधेन" आहे. पण मग प्रश्न येतो की काही लोकांना "हिन्दुत्व" म्हंटले की सांप्रदायिक,संकुचित, जातीयवादी असे का वाटावे? नुकतेच एका मित्राने फेसबुक वर नेमके स्टेट्स लिहिले होते..Hindutva is Hinduism with resistance...हिन्दुत्व म्हणजे हिन्दु व प्रतिकार यांची बेरीज. प्रतिकार ? कुणाचा? कशाचा? कशाप्रकारे? हिन्दुत्व प्रतिकाराच्या गरजेतुन जन्माला आले आहे...आपल्या धारणांवर झालेल्या हल्ल्यांचा प्रतिकार, सांस्कृतिक हल्ल्यांचा प्रतिकार, वैचारिक हल्ल्यांचा प्रतिकार, हिन्दुंच्या सुरु असलेल्या बुध्दीभेदाचा प्रतिकार, इतर पंथांच्या छल आणिअ बल पुर्वक सुरु असलेल्या विस्तारवादाचा प्रतिकार, या भुमी तील पुजनीय , गर्हनीय अशा सांस्कृतिक प्रतीकांवर सुरु असलेल्या हल्ल्यांचा प्रतिकार, पंथीय कट्टरतेचा प्रतिकार...हिन्दुत्व म्हणजे प्रतिकार.....त्यामुळे प्रतिकार करण्यासाठी कारणीभुत असलेल्या वर नमुद केलेल्या गोष्टी, षडयंत्रे थांबली म्हणजे "हिन्दुत्व" सुध्दा संपेल...ब-याच दिवसांपासुन हे लिहिण्यासाठी वेळ मिळत नव्हता, माझ्या मर्यादीत बुध्दीला शोभेल असच लिहिण्याचा बाष्कळ प्रयत्न केला आहे...त्रुटी असतील तर त्या माझ्या..योग्य जे असेल ते या संस्कृतीचे. सुधारणेला अजुनही जागा आहे असे मी मानतो, तर्क, बुध्दी, विज्ञान यांच्या आधारीत आपली सभ्यता आपण आणखी महान करु शकतो. अस्तु.