Saturday, September 2, 2017

जीडीपी आणि नोटबंदी



२०१७-१८ च्या दुस-या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.४ % इतका म्हणजे जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असा होता. तोच २०१६च्या दुस-या तिमाहीमध्ये हा दर ९.२ % इतका होता. २०१४ ला तो ८.३ % इतका होता. म्हणजे मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सुरुवातीला हा दर कमी झाला व नंतर २०१६ पर्यंत तो ९.२ % इथवर पोहोचला. आणि अर्थ शास्त्रींच्या मते २०१७ च्या ४थ्या तिमाहीपर्यंत हा दर ७.१ % पर्यंत पोहोचेल. चालु तिमाहीमध्ये उत्पादन क्षेत्र, खाणकाम आणि बाम्धकाम क्षेत्रामध्ये मागच्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत जास्त घट झाली आहे. त्याच वेळी आर्थिक सेवा, संरक्षण, दुरसंचार, हॉटेलींग, वाहतुक, व्यापार आदी क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आता नोटबंदीमुळे उत्पादन क्षेत्रात वाढ कमी झाली असे मानायचे का? बांधकाम क्षेत्राचे एकवेळ मान्य करता येईल कारण ते क्षेत्र त्या मानाने खुपच असंघटीत व व्यवस्थेला बगल देणारे आहे. त्यामुळे नोटबंदीचा फटका बांधकाम क्षेत्रास झाला हे एकवेळ मान्य करावे लागेल. राहीला प्रश्न खनिज खाणकाम. भारतील बहुतांश खनिजे खाणी सरकारी लिलाव पध्दतीने खाणकामासाठी विकल्या जातात. यातुन मिळणारे खनिज मुख्यत्वे करुन भारतातीलच उत्पादन क्षेत्रासाठी व थोड्या प्रमाणात निर्यात केले जाते. उत्पादन क्षेत्रातच मंदी असल्याने स्वाभाविकच खनिज उत्पादनावर त्याचा परीणाम होणारच. आता आपण उत्पादन क्षेत्रात मंदीचे कारण नोटबंदी असु शकते का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करु. 2013 मध्ये हाच दर ४.१ % इतक्या नीचांकी पातळीवर गेला होता व पुन्हा २०१६ मध्ये ९.२% इतक्या उंचीवर जाऊन आला. सोबतदिलेला चार्ट पाहिल्यावर आपणास हे नक्की समजेल की जीडीपी मध्ये चढ उतार हा मागणी आणि पुरवठा या साध्या तत्वावर अवलंबुन आहे. उत्पादन क्षेत्रातील घटता दर नोटबंदीमुळे झालेला नाही हे समजण्यासाठी काही मुद्दे पाहु यात.

१. उत्पादन क्षेत्रात कोणताही कच्चा माल रोखीने घेतला जात नाही
२. उत्पादन क्षेत्रात कोणत्याही कामगाराचे वेतन रोखीने दिले जात नाही
३. उत्पादन क्षेत्रात पंजीकृत कंपन्याचे उत्पादन आणि विक्री ही देखील मुळात कागदोपत्री होणार अशी अपेक्षा आसते, त्यानुसार कंपनीचे व्यवहार पध्दती रुढ झालेली असते. त्यामुळे नोटा नाहीत म्हणुन उत्पादन रखडले जाणे हे शक्यच नाही.
४. आपल्या भागात अनेक छोटे मोठे कारखाने आहेत. त्या कारखान्यांमध्ये आपल्या भागातील अनेक छोटे मोठे व्यावसायिक काही ना काही सेवा पुरवतात. जसे गाडी भाड्याने देणे, जेवण डबे, चहा, सब वेंडर, इत्यादी सर्व खर्च ह्या कंपन्या बॅकेतुनच करायच्या. सेवा पुअरवणा-यांना चेक ने पैसे चुकते केले जायचे(अजुन ही तसेच होत आहे)

एवढे सगळे व्यवहार जर नोटाशिवाय वर्षानुवर्षे सुरु आहेत तर नोटबंदीमुळे जीडीपी दर कमी झाला असे म्हणणे म्हणजे दुधखुळे पणा आणि नुसता आकस आहे यात शंका नाही.
नोटबंदीमुळे सामान्य नागरीकांस त्रास झाला यात शंकाच नाही. पण मुळात सामान्य माणसाकडे खुप मोठ्या प्रमाणात काळा पैसा (कर चुकवुन कमावलेला किंवा साठवलेला पैसा, म्हणजे रोखीने केलेले व कर चुकविलेले व्यवहार) इतका जास्त नव्हता की त्यास अगदी दररोजच रांगेत जावे लागले. जे काही थोडे फार पैसे सामान्य माणसाकडे होते ते बॅंकेत जमा करण्यासाठी एक किंवा दोन वेळाच जावे लागणे अपेक्षित होते. त्यापेक्षा जास्त वेळा बॅम्केत जावे लागले असेल, व अस्वस्थता शिगेला पोहोचली असेल तर काळा पैसा पांढरा करायचा कसा ? या एकाच चिंतेने असामान्यांचे हाल झाले. कर नाही तर डर कशाला, याप्रमाणे सामान्य जनतेने आनंदाने होणारा त्रास सहन केला. आधीच्या एका पोस्ट मधील ते श्रीमान क्ष़. होते की ज्यांना खुपच त्रास झाला. तरीही त्रास झाला हे नाकारता येत नाही. पण हा त्रास झाला म्हणुन नोटबंदीच चुकीची होती असे मानने सर्वथा अयोग्य आहे. काही लोकांचा रांगामध्ये मृत्यु देखील झाला. दुर्दैव. पण खरच नोटबंदीमुळे लोक मृत्युमुखी पडले का? तुमच्या माझ्या सारखा धडधाकट माणुस नाही मरण पावला. जे जर्जर झाले होते किंवा व्याधी होत्या , अती रक्तदाब किंवा हृद्यरोग आदी असणारेच मृत्युमुखी पडले. यात नोटबंदीचा दोष कसा काय? रांगा आम्हाला माहीत नव्व्हत्या का? , वीज बिल भरण्यासाठी रांग, फोन बिल भरण्यासाठी रांग, घरगुती गॅस टाकी मिळवण्यासाठी ४-५ तासाची रांग, राशन साठी रांग, रेल्वे तिकीटासाठी रांग, दाखले काढण्यासाठी रांग, दगडुशेठ, पंढरपुर, आळंंदी मध्ये दर्शनासाठी रांग, चितळ्यांकडे रांग, दारुच्या दुकानांमध्ये रांग, ॲडमिशन साठी रांग, रांग काय नवीन आहे आपल्याला? आणि रांगेत अपघात देखील होऊ शकतात. पण विरोधी पक्षातील लोकांनी या रांगेचा बागुलबुआ केला नोटबंदीच्या काळात. व , राई का पहाड केला. वरील पैकी ब-याच रांगा नोटबंदीच्या अनुषंगाने आलेल्या डीजीटल क्रांतीने कमी केल्या आहेत. व गॅससठीच्या रांगा नोटबंदीच्या आधीच्या जनधन व आधार जोडणी मुळे संपल्या आहेत.
सामान्य जनतेला त्रास झाला हे खरे असले तरी हा त्रास जनतेने आनंदाने स्वीकारला. दुख झाले ते त्यांनाच ज्यांच्या कडे काळा पैसा होता व तो रद्द बातल होण्याची त्यांना भिती होती.
आता मुळ मुद्द्याकडे वळु नोटबंदी यशस्वी झाली की नाही हा या लेखाचा विषय नाही. नोटबंदीचा 'क्ष' रीपोर्ट मध्ये नोटबंदी ची फलस्रुती वाचता येईल. याअ लेखाचा विषय आहे जीडीपी आणि नोटबंदीचा परीणाम. वर सविस्तर लिहिल्याप्रमाणे , नोटबंदीचा उत्पादन क्षेत्रावर अजिबात परीणाम झालेला नाही. मागणी आणि पुरवठा या साध्या तत्वावर उत्पादन क्षेत्र कार्य करते त्यानुसार उत्पादन दर वर खाली जाणे स्वाभाविक आहे. किंवा आणखी ही इतर घटक आहेत जे उत्पादन क्षेत्रावर प्रभाव टाकु शकतात. जसे प्रशासकीय सपोर्ट. निर्यात क्षमता वाढवण्यासाठीची धोरणे, गुणवत्ता धोरणे अमलबजावणी, इत्यादी. यातील कदाचित धोरणांच्या बाबतील सरकार ला दोष देता येऊ शकेल कारण ७० वर्षाची रुढ पध्दती त्यांनी ३ वर्षात बदलली नाही. असो हा वेगळा विषय आहे.
त्यामुळे जीडीपी दर घटणे आणि नोटबंदी यांचा दुर दुर पर्यंत संबंध नाही हे नक्की समजावे.

Monday, July 31, 2017

सह्याद्री आणि गोपाळांची संस्कृती



माझ्या सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये अनेकविध अनुभव घेता आले. सह्याद्रीची प्राचीनता आणि जैवविविधता सांप्रत अधिक चर्चिली जाते. सोबतच सह्याद्रीतील शिवाजी राजांचे अभेद्य किल्ले, द-या, डोंगर, विविध प्राचीन आणि आधुनिक घाट सर्वांनाच भुरळ पाडत असतात. सह्याद्रीने चालुक्य, यादव, माऊली, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, या सर्वांनाच मोहीत केलेले दिसते.
सह्याद्रीचे शौर्य अभेद्य किल्ल्यांच्या रुपात आजही विद्यमान आहे. प्रत्येक किल्ला त्याच्या अवतीभवतीचे गावे, गावागावातील माणसे, लढवय्ये, मावळे, हवालदार, भालदार, धारकरी, हारकरी, किल्यावरच्या बाजारपेठा. पायथ्याची गावे, गावागावातील विविध इतिहास, कथा, दंतकथा काही ज्ञात तर काही अज्ञात. आपणास एकच हिरकणी माहीत आहे. पण अशा अनेक हिरकण्या ह्या सह्याद्रीने पाहील्या असतील. अनेक बहादुर मर्द मावळे गावागावात, वस्त्यावस्त्यांमध्ये असतील.
सदोदीत उन वारा पाऊस यांचा मारा अंगावर झेलत सह्याद्री एखाद्या तपस्व्याप्रमाणे अढळपणे उभा आहे. तो अविचल आहे. तो निर्विकार आहे. कसल्याही बाह्य व्यवधानांचा परीणाम त्याच्या तपश्चर्येवर होत नाही.  म्हणुनच की काय सह्याद्रीची विरक्ती त्याच्या विविध  बौध्द लेण्यांतुन कोरली गेली आहे.

असंख्य प्राणीमात्रांस अभय देणा-या सह्याद्रीची एकात्मता त्याच्या अंगाखांद्यावर वाढलेल्या जैवविविधतेमध्ये आहे. सह्याद्रीचा रुद्रावतार त्याच्या काळ्याकभिन्न कातळकड्यांमध्ये आहे.
सह्याद्रीचे मातृत्व त्याच्या कड्या कपा-यांतुन उगम घेणा-या शेकडो नद्यांमध्ये आहे, ज्या पुढे जाऊन फक्त जलवाहीन्या न राहता जीवनवाहीन्या बनतात. किमान हजारेक नद्यांचा उगम सह्य रांगामध्ये होतो. काही पुर्व वाहीन्या तर काही पश्चिम वाहीन्या आहेत. शहरांना पिण्यासाठी पाणी, पाणी साठे, जलविद्युत प्रकल्प, शेतीसाठी धरणे, बंधारे, कालवे हे सर्व सह्याद्रीच्याच जीवावर आहे.
सह्याद्रीचे पितृत्व त्याच्या अंगाखांद्यावर हजारो लाखो वर्षे आनंदाने खेळणा-या बागडणा-या असंख्य प्राणीमात्रांच्या पालनपोषणामध्ये आहे. मागे एका लेखामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सह्याद्रीमध्ये आढळणा-या एका बेडकाची जात साडे आठशे लाख वर्षापुर्वीची मानली जाते. व ही जात फक्त सह्याद्रीमध्येच आहे. आणि हा पुरातन काळ म्हणजे या पृथ्वीतलावर मानव नावाच्या प्राण्याची उत्पत्ती होण्याआधीचा काळ आहे. संशोधकांचा कयास जर प्रमाण मानला तर, आपणास माहीत असलेल्या या ज्ञात जीवास सह्याद्रीने कित्येक लाखो वर्षे सांभाळले आहे हे स्पष्ट दिसते.
ह्यासोबतच सह्याद्रीच्या कुशीत भारतीय संस्कृतीची छाप अगदी डोंगर द-यात असणा-या वाड्या-पाड्यावर देखील पहावयास मिळते. आपल्याकडे एक म्हण आहे, की भाषा दर पाच मैलांवर बदलते. भाषा बदल म्हणजे सांस्कृतिक वेगवेगळेपण हे नक्कीच. असे हे वेगळेपण आपणास बारा मावळांत पहावयास मिळते. ही बारा ही मावळे सह्याद्रीच्या कुशीतच आहेत. हे वेगळेपण विशिष्ट प्रसंगी पहावयास मिळते. एक उदाहरण सांगतो इथे. आमचे कडे एखाद्या व्यक्तिच्या और्ध्वदैहीक आचारांमध्ये एका दगडास( खडा ) विशेष स्थान आहे. याला जीवखडा असे म्हणतात. आता जीवखडा नावाची संकल्पना बाराच्या बारा मावळांत म्हणजे महाराष्ट्रातील सह्याद्री मध्ये वसलेल्या डोंगरद-यात राहणा-या लोकांत आहे. पण त्यात थोडे थोडे भेद आहेत. जसे काही ठिकाणी हा खडा मरणोपरांत दहा दिवस घराच्या बाहेर टांगुन ठेवतात तर काही ठिकाणी तेरा दिवस. काही ठिकाणी हा खडा घराच्या आढ्याला आतुन टांगतात तर काही ठिकाणी हा खडा भिंतीला असेलेल्या खुंटीला टांगतात. तर सांगायचा मुद्दा असा की वेगळेपण असले तरी जीवखडा संकल्पना मात्र सगळीकडे दिसते. कुणी शिकवले असेल बरे ह्या मावळ भागातल्या म्हणजेच डोंगरद-यात वाड्यावस्त्यांमध्ये लोकांस हे कर्मकांड? हे कर्मकांड योग्य की अयोग्य हा वेगळा विषय आहे. पण हे एकसुत्रता सर्वत्र दिसुन येते. नुसतीच सह्याद्रीमध्येच आहे असे नाही तर संपुर्ण भारतात ही सांस्कृतिक एकसुत्रता दिसते आपणास.
विकृती, प्रकृती आणि संस्कृती ह्या तीनही संकल्पना तशा एकाच मुल तत्वावर आधारीत आहेत. व ते मुल तत्व म्हणजे निसर्गनियम होय. वेगवेगळ्या संदर्भात ह्या संकल्पनांची उकल करता येईल. दोन तीन वर्षापुर्वी आमच्या घरच्या झाडाचे आंबे उतरवायचे काम सुरु होते. मी झाडावर चढलो होतो व टिपुन एकेक आंबा काढत होतो. झाडाच्या एका फांदीला आता शंभरेक आंबे शिल्लक होते. इतक्यात आई म्हणाली आता बास झाले. राहीलेले आंबे झाडाला तसेच राहुदे. मी का असे न विचारताच झाडावरुन खाली उतरलो. व आंबे पिकवण्याची आढी लावुन झाल्यावर आईला विचारले झाडाला आंबे ठेवायला का सांगितलेस तु मला? त्यावर आई म्हणाली की आपण सगळेच्या सगळे आंबे काढायचे नसतात.झाडावर येणा-या पक्षांना प्रसंगी प्राण्यांना खाण्यासाठी हे आंबे असेच ठेवायची पध्दत पुर्वापार असेल खेड्यापाड्यात. यात संस्कृती पाहायला मिळते. सर्वच्या सर्व आंबे काढणे व ते खाणे किंवा विकणे ही विकृती आहे. व जेवढी भुक आहे तेवढेच आंबे काढुन खाणे ही प्रकृती आहे. पण या एका प्रसंगात संस्कृतीची खुण दिसते. ही संस्कृती देखील सह्याद्रीचे अंगभुत वैशिष्ट्य आहे. एखादा समाज किती सुसंस्स्कृत आहे हे पाहण्यासाठी त्या समाजात कोणत्या चालीरीती आहेत, कोणत्या कला कौशल्यांना त्या समाजात स्थान आहे , समाजात  कोणते छंद जोपासले जातात , त्या त्या समाजात संगीत, लेखण वाचन आदी विषयी कितपत ज्ञान आहे , या सर्वांवर त्या त्या समाजाचा सुसंस्कृतपणा किती उच्च दर्जाचा आहे हे समजते. भुमीस माता म्हणणारा आपला हा मावळातला समाज सांस्कृतिक दृष्ट्या अभ्यासाचा एक स्वतंत्र विषय आहे. आपल्या विविध चालीरीतींच्या मागे एक विज्ञान आहे. मी दहावी मध्ये असताना माझे इंग्रजीचे शिक्षक श्री गुलाबराव सपकाळ सरांनी मला एक अप्रतिम पुस्तक वाचण्यासाठी दिले. प्रा. सौ कांचनगंगा गंधे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे नाव ही भारी्च आहे. “आपले वृक्ष आपली संस्कृती”. यात आपल्या विविध सणवारांमध्ये चालीरीती प्रथांमध्ये वापरल्या जाणा-या विविध वृक्ष वेलींचे सांस्कृतिक तसेच वैज्ञानिक महत्व त्यांनी सण व वृक्ष वार सविस्तर लिहिले आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीला वैज्ञानिक आधार आहे व तो अगदी दुरदुर्गम अशा डोंगरद-यात राहणा-या आमच्या सह्याद्रीवासीयांना माहीत देखील होता. कोणत्याही संस्कृतीचे आणखी एक महत्वाचे अंग असते. ते म्हणजे सहजीवन. आधुनिक पाश्चात्य लेखक स्टीफन कॉव्हे याने त्याच्या एका सुपसिध्द पुस्तकात Interdependence is higher value than Independence असे तत्व मांडुन त्या तत्वास कॉर्पोरेट जीवनात यशाची गुरुकिल्ली असे म्हंटले. जाती पाती आणि उच्चनीच असा ओंगळवाणा वाटणारा प्रकार म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन वर म्हंटलेल्या परस्परालंबित्वाचे एक विकृत रुप आहे. जात हा शब्दास कारकुनी महत्व येण्याआधी आपल्याकडे बलुतेदार नावाची व्यवस्था कित्येक हजारोवर्षे वृध्दींगत होत गेली. त्याचे एक उदाहरण मला अगदी दोन तीन वर्षापुर्वी मोसे मावळ खो-यात फिरताना दिसले. बलुतेदारी संपली. पण काही ठिकाणी ती अजुन आहे. मी एकदा, पानशेत वरसगाव हुन मोटारीतुन मुठा खो-याकडे येत होतो. तसा हा भाग ही दुर्गमच. अजुन ही तासनतास ह्या रस्त्यावर एखाददुस-या वाहनापेक्षा जास्त काही दिसत नाही. तर या प्रवासात, कोंढुर गावाजवळ, एक व्यक्तिने माझ्या गाडीला हात केला व लिफ्ट मागीतली. उंचीने साडेचार ते पाच फुट उंच थोडासा जाड, गव्हाळ, पायजमा आणि टोपी घातलेला हा माणुस या गावातीलच असणार असे मला वाटले व माझा तर्क बरोबर निघाला. गाडीत बसल्यावर त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यात त्यांच्या मुलांचे इंजिनियरींग वगेरे शिक्षणाविषयी समजले. ते कुटुंब सध्या पुणे शहरात राहते. मी त्यांना विचारले की इतक्या उशीरा कसे काय निघालात पुण्याकडे तर ते म्हणाले की ते ज्ञाती ने न्हावी आहेत व गावात जोंधळे घ्यायला आले होते. दर शनिवारी व रविवारी ते गावी येतात व गावातील लोकांची दाढी डोकी (हजामत) करतात. त्यांच्याकडे स्वतची शेती नाही. पण ह्या बलुतेदारीतुन त्यांना त्या वर्षी २८ अठ्ठावीस पोती भात, तेवढीच ज्वारी मिळाले. व त्यांच्या जन्मापासुन त्यांना व त्यापुर्वी त्यांच्या वाड वडीलांना देखील ही बलुतेदारी होती. पुर्वी त्यातीलच काही विकुण मसाले,तेल, कपडे आदी विकत घेत. म्हणजे गावातील गावकी मध्ये प्रत्येक घटकास सामावुन घेण्याची क्षमता होती व त्या प्रत्येक घटकाच्या पालनपोषणाची जबाबदारी समाज घेत होता. असेच पुर्वी इतर बलुतेदारांचे ही असायचे. व संस्कृतीच्या ह्या खाणा खुणा सह्याद्रीच्या कानाकोप-यात आज ही पहावयास मिळतील.
अंदाजे सहा सात वर्षापुर्वी मी हिरडस मावळात काही कामानिमित्त गेलो होतो. तिथे मला आश्चर्य चकीत करणारा असा सह्याद्रीच्या प्रगल्भ व अतीश्रीमंत संस्कृतीचा पुरावाच मिळाला. तिथे एक गोपाळ भेटला. गोपाळ हे त्याचे नाव नव्हते तर त्याच्या कामावरुन त्याला व त्याच्या सारख्या अनेकांना पडलेले नाव होते. हा गोपाळ गायीं पाळणाराच होता. व त्याही पुढे जाऊन गोपाळकृष्णासारखा एक पावा म्हणजे बासरी देखील घेऊन डोंगरावर गायींना चारत होता. वीसएक गायी, काही बैल, वासरे, गो-हे असा पन्नास एक जनावरांचा कळप त्याच्या मागेपुढे चरत फिरत होता. त्याच्या डोक्यावर पांढरी टोपी होती . अंगावर साधी मळकी कपडे होती. व आणखी एक विशेष घोंगडी की जिला जागोजाग घुंगरांनी सजवले होते अशी घेउन स्वतला पाउस व थंडीपासुन वाचवुन गायींना चारत होता. त्याच्या पाव्याला देखील घुंगरं लावली होती. त्याचे नाव गाव विचारले नाही. पण त्याच्याकडुन हे समजले की मावळात अशा प्रकारचे गोपाळ गावोगाव असत. यावरुन सह्याद्रीच्या कुशीतील एकेकाळच्या श्रीमंत संस्कृतीचे पुसटशे दर्शनच आम्हाला घडले. निसर्गात गायींना चारण्यासाठी घेऊन जाणे व बासरी वाजवणे, संगीत साधना करणे, निसर्ग व स्वतच्या गायी यांच्याशी एकात्मभाव स्थापित करणे हा तर हेतु नसेल ह्या गोपाळांचा?
लेखाच्या शेवटी दिलेल्या पेजवर जाऊन या गोपाळाचा पावा वाजवतानाचा व्हिडीयो अवश्य पहा.

Friday, July 14, 2017

धर्म म्हणजे काय?

(मूळ: धरणे किंवा बंधून राहणे, सवयीनुसार काळजीपूर्वक पालन करणे): सामाजिक रित्या संघटित मान्य झालेल्या, एकत्रित जुळत असलेल्या सर्व वितर्कीय कल्पनांचा संग्रह जोपर्यंत त्याचा निसर्गातअस्तित्वात असलेल्या गोष्टींशी (उदा. व्यक्ती, वस्तू, विश्वे, इत्यादि) निगडित असण्याचा दावा असतो. –


महाभारतानुसार 'ध्रियते लोकोनेनेति धर्मः| धारणाद् धर्ममित्याहुऱ् धर्मो धारयते प्रजाः||' अर्थात 'समाज व प्रजा धारण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठायी तो धर्म. '
धर्म ही एकच संकल्पना अशी आहे की जिने आजपावेतो जगात सुख व शांतता व समाधान, करोडो लोकांस दिले. त्यासोबतच धर्मानेच आजपर्यंतची सर्वात मोठी मनुष्यहानी केली आहे. धर्म म्हणजे काय हे जाणुन घ्यायचे असेल तर आधी या शब्दाच्या उगमाकडे जावे लागेल. आपण धर्म म्हणजे काय हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. सर्वात आधी एक मिथक आपण तोडले पाहीजे , ते म्हणजे, धर्म या शब्दास अन्य कोणत्याही पाश्चात्य भाषेत समानार्थी शब्द नाही. धर्म या शब्दाच्या जवळचा अर्थ असणारा आंल्ग शब्द basic instict हा आहे.तरीही हा इंग्रजी शब्द धर्म या भारतीय शब्दाची व्यापकता वर्णु शकत नाही. त्यामुळे पुढे वाचण्यापुर्वी हे पक्के लक्षात असुद्या की धर्म या शब्दाविषयी जाणुन घेताना भारतीय दृष्टीकोनातुनच पाहीले पाहीजे. दुसरे एक मिथक आपण समुळ नष्ट केले पाहीजे. ते म्हणजे धर्म म्हणजे रीलीजन. रीलीजन हा धर्म या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. रीलीजन हा शब्द कोणत्या भारतीय शब्दाचा समानार्थी शब्द आहे हा ह्या लेखाचा विषय नाही. असो, तर मग आपण दोन गोष्टी नीट समजुण घेतल्या असतील तर धर्म म्हणाजे काय याकडे आपणास पाहता येईल व्व समजुन घेता येईल. तर पुन्हा एकदा ह्या दोन खुळचट समजुती आपण पाहु...खूळचट समजुत १.- रीलीजन म्हणजे धर्म ....खुळचट समजुत २.- सर्व धर्म समान असतात (ही एक खुळचट समजुत आहे असे म्हणण्याचे कारण असे की अधिकांश लोकांना धर्म म्हणजे हे माहीत नसताना ते धर्म या विषयावर काथ्याकुट करण्यात अग्रेसर असतात)
आता धर्म म्हणजे काय याकडे पाहु.
वेगवेगळ्या भारतीय दर्शनांमध्ये प्रसंगपरत्वे धर्म या शब्दाचा अर्थ मांडण्यात आलेला आहे. तो तो अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये योग्य आहे म्हणजेच ते सर्व अर्थ योग्य आहेत असा सरळ तर्क लावता येईल. ज्या विशिष्ट गुण विशेषा मुळे एखाद्या वस्तु, सजीवास त्याचे वेगळेपण प्राप्त झालेले असते त्या गुण विशेषास धर्म असे म्हणता येईल. याचे कारण धृ म्हणजे धारण करणे या संस्कृत धातुचा आधार जरी घेतला वस्तु, जीवाने धारण केलेल्या गुणविशेषास धर्म म्हणता येईल. धर्म या शब्दाचा भाषा, संस्कृती, इतिहास, सभ्यता, समाज इत्यादीशी संबंध जोडला तर त्याचा अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये बदलतो. पण तरीही धर्म या शब्दाचा मुळ अर्थ काय आहे? व हा अर्थ सहज समजेल अशा बोली भाषेत सांगता येईल का? तर याचे उत्तर आहे, हो! सहज सोप्या भाषेत या शब्दाचा अर्थ सांगता येईल व समजुन देखील घेता येईल. तर काय आहे हा अर्थ?
सह्ज समजेल अशा भाषेत सांगायचे तर धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती. धर्म म्हणजे उपजत वृत्ती. धर्म म्हणजे अंगभुत गुणविशेष. व अशी सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती, अंगभुत गुणविशेष हे बाहेरुन आणता येत नाहीत. हे मुळचेच असतात. याची काही उदाहरणे पाहील्यावर आपणास याचा नेमका अर्थ काय आहे हे समजेल.
उदा १ - वस्तु - पाणी व या वस्तुचा अंगभुत गुण - शीतलता
उदा २- वस्तु - हवा व या वस्तुचा अंगभुत गुण - चंचलता
उदा ३ - वस्तु - अग्नि व या वस्तुचा अंगभुत गुण - दाहकता
उदा ४ - वस्तु- पाषाण - व या वस्तुचा अंगभुत गुण - जडता
वरील उदाहरणे निर्जीव एककांची आहेत. आता सजीवांची काही उदाहरणे पाहुयात
उदा १ - वाघ - भुक लागली असता आणि प्रतिस्पर्धी वाघ अथवा प्राण्यापासुन संभाव्य धोका टाळण्यासाठी हिंसा करणे.(भुक भागवण्यासाठी , अस्तित्व टिकवण्यासाठी हिंसा करणे)
उदा २ - वाघ - जीवाच्या आकांताची, कितीही भुक लागली असेल व व शिकार मिळाली नसेल व मिळणार नाही असे समजलेजरी असेल तरीही वाघ गवत खात नाही.(अखाद्य न खाणे)
उदा ३ - गाय वासरु - वात्सल्य
उदा ४ - गरुड - विहंगम करणे
उदा ५ - मासा - पाण्यामध्ये झोप घेणे
वरील काही उदाहरणे प्राण्यांची पाहीली , आता आपण मनुष्याशी निगडीत काही उदाहरणे पाहुयात
उदा १ - स्त्री - ममत्व, वात्सल्य. ही एक अजब वृत्ती आहे. कुमारीके मध्ये कदाचित हा गुण सुप्तावस्थे मध्ये असतो. पण एकदा का ती कुमारीका प्रसुता झाली की तिला ममतेचा पान्हा फुटतो. हा गुणविशेष भावनिक व शारीरीक अशा दोन्ही पातळ्यांवर व्यक्त होतो. पण जोपर्यंत ममत्वाचा आविर्भाव होत नाही तोपर्यंत त्या कुमारीकेस ममत्व म्हणजे काय हे कितीही निबंध लिहुन कुणी समजावु जाईल तरीही तिला समजणास नाही. ममत्व , मातृत्व ही स्त्री मधील उपजत सहज अंगभुत वृत्ती आहे. ही वृत्ती कुणी नष्ट करण्याचा प्रयत्न करेल तरीही ती होणार नाही. व प्रसंगी स्त्री बाळासाठी निकराने स्वतच्या जीवाशी देखील खेळते. स्वतचा जीव संकटात टाकुन बाळाला वाचवणा-या माता आपल्याला अनेक माहीत आहेत. यास मातृ-धर्म असे म्हणतात. थोडक्यात स्वतच्या बाळासाठी जे जे योग्य आहे ते ते करण्याची उस्फुर्त प्रेरणा म्हणजे मातृ-धर्म होय.
उदा २ - पिता - पितृ-धर्म. एखाद्या तरुणास, वडील झाल्यावर(म्हणजे त्याला अपत्य झाल्यावर), त्याच्या भावविश्वामध्ये जे काही बदल होतात, त्यानुसार त्या तरुणास स्वतच्या अपत्याविषयी जी ओढ लागलेली असते, त्यास व त्या अनुषंगाने त्या अपत्याच्या पालनपोषणासाठी व संस्कारांसाठी तो स्वतच्या दिनचर्या तसेच सामाजिक चरीत्रामध्ये एक विशिष्ट बदल करतो त्यास पितृ-धर्म असे म्हणतात. ही मुलभुत प्रवृत्ती आहे. योग्य वेळ आली की आपोआप आविष्कृत होत असते. म्हणजे आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या पित्याच्या स्वतच्या अपत्यासाठी उस्फुर्त प्रेरणा व त्याद्वारे त्यास जो कर्तव्यबोध होत असतो त्यास पितृ धर्म असे म्हणतात.
उदा ३ - पुत्र - पुत्रधर्म
उदा ४- मित्र - मित्र-धर्म
उदा ५ - राजा, राज्य - राजधर्म
वरील उदाहरणे मनुष्याशी निगडीत आहेत. यात एकच मनुष्य वेळोवेळी अनेक प्रकारच्या धर्माचे आचरण करु शकतो. तो मनुष्य कोणत्या भुमिके मध्ये आहे यावर अबलंबुन आहे तो त्या प्रसंगी कोणत्या धर्माचे पालन करील. उदाहरण दाखल नुकताच प्रदर्शित झालेला बाहुबली २ हा सिनेमा व त्यातील पात्र शिवगामी देवी घेऊ. एक शासक म्हणुन तिला राजधर्म पाळायचा होता व भल्लाल ची आई या नात्याने तिला मातृधर्म पाळायचा होता. आंधळ्या पुत्रप्रेमापोटी निष्पाप बाहुबलीस प्राण गमवावे लागले व याचाच अर्थ तिच्याकडुन राजधर्माचे पालन झाले नाही. इथे कोणत्या धर्माचे पालन करावयास हवे होते? तर राजधर्माचे नीट पालन. कोणत्या ही पुर्वग्रहाशिवाय तिने बाहुबली व त्याची पत्नी यांस त्यांचे मत मांडण्याची संधी, एक शासक या नात्याने द्यायला हवी होती. तर मुद्दा असा आहे की जर जे करणे नीती व न्यायास अनुसरुन आहे ते करणे म्हणजे त्या त्या परीस्थीतील धर्म होय.
वरील सर्व विवेचनावरुन किमान एक संभ्रम्म तरी दुर व्हावा. की धर्म म्हणजे रीलीजन नाही. धर्म व रीलीजन, अगदीच काय तर सांप्रदाय यांचा दुर दुर पर्यंत संबध नाहीये. धर्म म्हणजे उपजत वृत्ती, धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, धर्म म्हणजे अंगभुत गुण, धर्म म्हणजे योग्य. धर्म म्हणजे सत्य. धर्म म्हणजे सदोदीत सत्य. धर्म म्हणजे नित्य. धर्म म्हणजे अंतःप्रेरणा, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे न्याय.

Monday, July 10, 2017

नाच्या बेडुक


नाच्या बेडका विषयी दोन तीन वर्षापुर्वी वाचले होते. परवा आपल्या निसर्गशाळा कॅम्पसाईट परीसरात हा बेडुक प्रत्यक्ष पाहाण्याचा योग आला. यशदिप आणि जेवण आटोपुन पसायदाना विषयी एक ऑडीयो ऐकत झोप येण्याची वाट बघत होते. कॅम्पिगला आलेले लोक देखील कॅम्पफायर भोवती गराडा करुन गप्पा टप्पा मध्ये मग्न होते. आमच्या किचन शेड वर नळीचा पत्रा आहे. अचानकच पावसाची एखादी सर यायची आणि आमच्या डोक्यावर (पत्र्यावर) ताशा वाजवुन जायची. असा हा ताशाचा आवाज थोडा कमी झाला की मग मात्र एक विशिष्ट आवाज दुरवरुन कानावर येत होता. चालबध्द, लयबध्द उच्च स्वरात म्हणजे अगदी खर्जातला वाटावा असा हा आवाज लक्ष वेधुन घेत होता. सोबतीलाच अनेक वेगवेगळे आवाज येत होते. पण त्यात एकतानता होती. साद होती, तर प्रतिसाद देखील होती. आम्ही दोघांनी या आवाजांच्या दिशेने जायचे ठरवले व फोन आणि टॉर्च घेऊन त्या आवाजाच्या दिशेने निघालो. आमचा शोध कॅम्पसाईट शेजारच्या भाताच्य खाचरात संपला. त्या खाचरात शेकडो बेडुन होते. वेगवेगळ्या जातींचे. (प्रजातींचे योग्य शब्द आहे.) त्यातल्या त्यात ज्या आवाजाचा पाठलाग करत आम्ही आलो तो आवाज व त्या आवाजाचा उदगाता तो बेडुक देखील दिसला. याला नाच्या बेडुक म्हणतात. सोबत दिलेल्या वेबसाईटच्या पेज वर जाऊन त्याचा व्हिडीयो पाहता येईल. नाच्या बेडुक हे त्याच्या द डान्सींग फ्रॉग या इंग्रजी नावाचे स्वैर भाषांतर आहे. अंदाजे दोन तीन वर्षापुर्वीच शास्त्रज्ञांना अशा प्रजातीचा बेडुक असतो हे समजले. त्याच्या विशिष्ट प्रकारे पाय हलवण्याच्या व आपटण्याच्या सवयी मुळे त्या प्रजातीस सर्रास डान्सींग फ्रॉग असे बोली भाषेतले नाव पडले. तर हा नाच्या बेडुक दिसला आणि त्याचे ते खर्जातले गाणे गाताना त्याचे आविर्भाव व त्याचा नाच देखील दिसला. सोबतच्या लिंकवर क्लिक करुन अवश्य हा व्हिडीयो पहावा.


त्यानंतर ह्या बेडकाविषयी जरा अधिक माहीती शोधण्याचा प्रयत्न केला व आणखी एक अचंबित करणारी माहीती पुढे आली. बेडकाची ही विशिष्ट जात ८५० लक्ष वर्षापुर्वी अस्तित्वात आली असा अभ्यासकांचा दावा आहे. म्हणजे माणुस नावाचा प्राणी अस्तित्वात येण्याच्या कित्येक लाखो वर्षे आधी ही बेडकाची प्रजात अस्तित्वात आली.  प्रियराधनासाठी हा बेडुक पायाच्या हालचाली करतो असे अभ्यासकांना सुरुवातीस वाटले. नतर च्या अभ्यासातुन हे समजले की समागमासाठी तो नाचत नाही तर, मादीपासुन इतर अन्य नर बेडकांना हाकलुन लावण्यासाठी हा पायाचा उपयोग करतो. अगदी पैलवानाने षडडु ठोकावा तसा काहीसा प्रकार आहे. षड्डु ठोकुन ही प्रतिस्पर्धी नर ऐकत नसेल तर मग लत्ताप्रहार (म्हणजे लाथ मारणे) हा प्रयोग करावा लागतो. समागमानंतर, हा बेडुक नर आणि मादी दोघे ही पुन्हा भुमिगत होतात. व पुन्हा पुढच्या वर्षी फक्त दोन आठवड्यांसाठी जमीनीच्या पृष्टभागाच्या वर येतात. म्हणजे जवळजवळ १२ ही महीने हे झोपतात. यांचे जीवनमान किमान ८ ते १६ वर्षांचे असु शकते.

सध्याची स्थिती अशी आहे की, वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे ह्या जातीचे तसेच बेडकाच्या अन्य ही अनेक जातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
मला ज्ञात असलेला एकच देव आहे. तो म्हणजे निसर्ग. ह्या देवाची लिला अपरंपार आहे. किती विविधता आहे पहा या विश्वाच्या पसा-यात. कुणी शाकाहारी तर कुणी मांसाहारी. कुणी पाण्यात राहणारे तर कुणी पाण्या बाहेर राहणारे. तर कुणी कुणी पाण्यातही आणि पाण्याबाहेर ही राहु शकणारे. निसर्गाचे चक्र अव्याहतपणे फिरते आहे. निसर्गातील अन्न साखळी स्वयंचलीत आहे. किमान अजुन तरी आहे. वाढत्या मानवी हस्तक्षेपाने ह्या अन्नसाखळीतील काही कड्या तुटावयास आलेल्या आहेत. वाढत्या अन्नाची गरज, नवनवीन शेतजमीन तयार करण्याची गरज,  पाण्याचे प्रवाह बदलण्याची गरज, फार्महाऊस साठी जमीन सपाटीकरण करीत पर्यावरण परीस्थितीकीला बदलण्याची गरज, उत्पादन वाढीसाठी व किटनियंत्रणासाठी विषारी खते व औषधांची गरज, या अशा अनेक कारणांमुळे नाच्या बेडकासारख्या असंख्य जीवांचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

देवाने मानवास पृथ्वीवरील एक सहचर म्हणुन बनविला, पण माणुस स्वतःस या पृथ्वीचा स्वामी समजु लागला आहे. व याच्याच परीणामी, स्वतच्या फायद्यासाठी सृष्टीचे अव्याहत पणे शोषण मनुष्य करतो आहे.  नाच्या बेडकासारख्या असंख्य प्रजाती असतील. इतर अनेक प्राण्यांच्या देखील असतील. व काही संपुष्टात देखील आल्या असतील. व सांप्रत या सर्वास जबाबदार मनुष्यच आहे. चंगळवाद व उपभोगवादाच्या दुष्टचक्रात अडलेल्या आधुनिक माणसाला हे समजत देखील नाही की त्याचा निसर्गातील आततायी हस्तक्षेप एक दिवस त्यालाच संपुष्टात आणेल.

ह्या दुष्टचक्रातुन सुटका करुन घ्यायची असेल तर मुल्यांची पुर्नस्थापना करणे गरजेचे आहे. "इदं न मम" ह्या व अशा अनेक प्राचीन मुल्यांना प्रतिष्टा प्राप्त करुन देणे गरजेचे आहे. "मी" चा म्हणजे "अहं"चा उत्तरोत्तर विकास होत गेला पाहीजे. हा देहाधारी मी (अहं ब्रम्हास्मी), कालौघात व संस्कारांत व्यक्ति, व्यष्टीच्या पुढे गेला पाहीजे. व्यष्टीकडुन त्याने समष्टी(समाज) झाले पाहीजे व समष्टीकडुन सृष्टीमध्ये त्याचा अहंकार विलीन झाला पाहीजे. ही सृष्टी म्हणजेच मी आहे असा अनुभव मनुष्यास आला पाहीजे. याला आपल्या संस्कृतीमध्ये एक सुंदर वाक्य वापरलेले आहे. "सर्व खल्विदं ब्रम्ह"...हे सर्व जगच ब्रम्ह आहे.  असा अनुभव म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन एकाच जाणिवांच्या पातळीवर किंवा हवे तेव्हा हवे तसे हव्या त्या जाणिवेच्या पातळीवर जाऊन हव्या त्या प्राणीमात्राच्या जाणिवा जाणता येणे व सहवेदना सहन करणे, असे तर नसेल?  आपण सगळे एकच आहोत. माझ्यात , तुझ्यात, सर्वांच्या अंतरी, सर्व प्राणीमात्रांत तीच एक चेतना विद्यमान आहे. हा समान धागा पकडुन आपण म्हणजे मनुष्य स्वामी नसुन सृष्टीतील इतर सर्व जीवांचा(प्राणी आणि वनस्पती) एक सहचर आहे हा संस्कार माणसामाणसावर करता येईल का?. त्यातुन मग शोषणाची वृत्ती नाहीसी होऊन आवश्यक तेवढेच व इतरांस कमीतकमी अपाय  होऊन मिळेल तेवढेच निसर्गाकडुन घेण्याची सहज, उपजत प्रवृत्ती (म्हणजे धर्म) रुढ होईल.

खरच हे अवघड आहे का?

असो, विषयांतर झाल्यासारखे वाटले असेल कदाचित आपणास हे सर्व वाचताना. सुरुवातीस पर्यावरण, निसर्ग आणि शेवटास अध्यात्म. जर आपणास असे वाटले असेल की विषयांतर झाले तर आज किमान हे नक्की शिका की निसर्ग आणि अध्यात्म वेगळे नाही. निसर्गाच्या कणाकणात अध्यात्म आहे. प्रत्येक जीव (मनुष्य देखील) एका अज्ञात, निनावी , अनाकलनीय अशा सुप्त जिज्ञासेने पछाडलेला आहे. प्रत्येकास काही ना काही मिळवायचे आहे. कशाची तरी कमतरता आहे. प्रत्येक सजीव अविरत जीवंत राहण्याचा अटोकात प्रयत्न करताना दिसतो. जीवंत राहण्यासाठी खटाटोप सुरु आहे. अहोरात्र सुरु आहे. पण जीवंत का राहायचे? ह्याची उकल काही कुणालाच झालेली नाही. व ती याची देही याची डोळा होईल असे वाटत ही नाही कारण जीवंत काअ राहायचे? हा प्रश्नच जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत त्याचे उत्तर शोधण्याची किंवा मिळवण्याची सुतराम शक्यता नाहीये. संघर्ष, अपार कष्ट, प्रेम, मैथुन , निद्रा व कारण माहीत नसताना जीवंत राहण्याचा आग्रह व त्यासाठीचे कष्ट, ही सगळी लक्षणे त्या नाच्या बेडकाची आहे. आणि मनुष्याची देखील आणि चराचरातील सर्व प्राणीमात्रांची देखील आहेत. आणि हा बेडुक तर माणसापेक्षा कित्येक शेकडो वर्षे आधी पृथ्वीवर अस्तित्वात आला आहे. त्याच्याकडे जास्त अनुभव आहे व तो अनुभव पुढच्या पिढ्यांकडे सोपवला जात आहे. व ह्या सर्व क्रियाकलापाचा हेतु जर त्या न पडलेल्या प्रश्नाची उकल करणे हा असेल तर हा बेडुक माणसापेक्षा नक्कीच जास्त जवळ पोहोचला असेल त्या उत्तराच्या.  त्यामुळे विषयांतर अजिबात नाही. आपल्यातील चिकित्सक वृत्ती जागी व्हावी. पर्यावरण, निसर्ग हे काही आपल्यापेक्षा वेगळे काही नाहीये. आपण स्वतःच निसर्ग आहोत. इतर सर्व प्राणीमात्रांचे सहचर आहोत स्वामी हा संस्कार आपण पुढच्या पीढ्यांना देऊया.
माऊलींच्या पसायदानामध्ये परवाच एक ओवी ऐकली. त्याप्रमाणे होवो.


॥जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात...॥

विसरु नका - वेबपेज वर जाऊन नाच्या बेडकाचा नाच आणि सुरेल गाणे जरुर ऐका.

http://nisargshala.in/amazing-kick-boxer-nisargshala/

Friday, June 2, 2017

लवासा, सत्ताधारी व जनता


लवासा च्या २०१६ च्या ताळेबंद मध्ये लवासाची एकुण मिळकत (असेट्स) ३२८७०१.७५ लक्ष रुपये एवढी दाखविली आहे. हा आकडा लाखांत आहे. नीट समजुन घ्या, ३२८७०१.७५ लाख आहेत हे, ३ लाख नव्हे. म्हणजे ३,२८,७०,१०,७५,०००/- (तीनशे अठ्ठावीस अब्ज रुपये)रुपये एवढी एकुण मिळकत.(बर हा जाहीस केलेला आकडा आहे. जाहीर न केलेला खरा आकडा यापेक्षा चार पट जास्तच असेल)
लवासा कुणाच्या छत्रछायेखाली तयार झाले, व पडद्यामागचे खरे धनी कोण आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. लवासाचा उद्य आणि विकास मागील १५ ते १७ वर्षात झालेला आहे. ज्या दुरदर्शी लोकांनी हे स्वप्न पाहीले व ते सत्यात उतरवले त्या लोकांस मानले पाहीजे.
आता गम्मत पहा...कॉन्ग्रेस गेली ७० वर्षे देशात व राज्यात सत्तेवर आहे, तर राष्ट्रवादी गेली १५ वर्षे पेक्षा जास्त काळ सत्तेत होती. या जनप्रतिनिधींना लवासास कर्ज, ना हरकत प्रमाणपत्रे, परवानग्या इत्यादी देता आले तसेच सत्ताधा-यांपैकी काहींचे शेयर्स देखील लवासामध्ये आहेत.
लवासा इतके मोठे होते, आर्थिक नफ्याचे नवनवीन टप्पे गाठते, तर त्याच सत्ताधा-यांना, शेतक-यांसाठी शेतीआधारीत उद्योग, लघुउद्योग, सुक्ष्म उद्योग आदी का करता येऊ नये?
केवळ नफेखोरी व स्वतःची व स्वतःच्या नातेवाईकांची घरे भरण्यासाठी यांनी सरकार चालवले अर्धशतकाहुन ही जास्त काळ. शेतकरीच नाही, तर कुशल अकुशल बलुतेदार, मजुर, भुमीहीन, अल्पभुधारक यांचा विचार फक्त कागदावरच राखीव जांगासाठीच केला गेला, व भोळी जनता आरक्षणाच्या प्रलोभनास बळी पडली.
वर्तमान सरकारला जर जनतेसाठी खरच काही करावयचे असेल तर, उद्योजकता विकसित करण्यावर अधिक भर दिला पाहीजे. मागणी आणि पुरवठ्याचे तंत्र समजुन स्थानिक पातळीवर विविध उत्पादने तयार करण्याचे कुटीरोद्योग गावोगाव निर्माण होतील याकडे लक्ष देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी लागेल.
तसेच स्वतःस पुढारी म्हणवुन घेणारे, वाढदिवसाची बॅनर बाजी करणा-यांनी स्वतस एक प्रश्न विचारुन पहा, की तुमच्या मुळे असे किती कुटीरोद्योग निर्माण झाले व किती लोकांस रोजगार मिळाला?
स्वतःची पोळी भाजुन घेण्यात अधिक रस असल्याने मागील सत्ताधा-यांना समस्येचे नीटसे आकलन झालेच नाही. लोकनेत्यांनी, तथाकथित जाणत्या राजाने, दादाने, ताईने स्वतःचे हजारो क्लोन निर्माण केले त्यामुळे ह्या क्लोनांना त्यांच्या मुळ प्रतींमध्ये दोष दिसणार नाहीच, तसेच हे क्लोन जनसामान्यांमध्ये इतके खोलवर रुतलेले आहेत की तळागाळात देखील ह्या मुळ, ओरीजीनल नेत्यांच्या अवगुणांनी भरलेले कार्यकर्ते अजुनही समाजात विष कालवण्याचे काम इमानेइतबारे करीत आहेत.
एखादा शेतकरी जो अपार कष्टाने पीक घेतो, जेव्हा त्याने घेतलेले पीक जेव्हा मळनी ला अथवा काढणीला येते , व शिवारात वा-यावर डोलते, धान्याच्या छोट्याअ का होईना पण राशी तयार होतात, तेव्हा शेतक-याच्या चेह-यावर एक अवर्णनीय असा आमोद व हृद्यात उचंबळणा-या पुर्णत्वाच्या भावनाच सगळ काही देऊन जातात. तो शेतकरी त्याचे ते पीक, भाजीपाला रस्त्यावर फेकुन देईल? कदापि शक्य नाही. आणि जर कोणी देतच असेल तर समजा की तो शेतकरी नाहीच. त्याच्यासाठी शेती ही फक्त एक मशीन आहे. पण आपला शेतकरी ह्या शेतीस काळी आई म्हणतो. ह्या काळ्या आईने दिलेले जोंधळे शिरोधारी घेऊन, त्याचा यथोचित आदर, पुजा करुनच शेतकरी स्वत हे धनधान्य खातो किंवा इतरांस देतो. शेतक-यासाठी त्याने पिकविलेले धान्य म्हणजे त्याच्यासाठी पृथ्वीमातेने दिलेला प्रसादच असतो. तर असा अमुल्य ठेवा रस्त्यावर फेकणारा शेतकरी असुच शकत नाही.
बदलत्या काळानुसार मुल्य अदलाबदलीची पध्दत बदलली असली तरी डोलणारे शिवार व धान्याची रास यातुन जे आत्मिक समाधान शेतक-यास मिळते ते अन्य कशातच नाही.
काळ बदलला असला, पिक, धान्य भाजीपाला, याची किंमत रुपया पैश्यामध्ये व्हायला लागली तरीही शेतक-यासाठी त्याचे पीक स्वर्गसुखाहुन ही श्रेष्ट होते व आहेच.
त्यामुळे दुध , फळे , भाजीवाला इत्यादी,(मग ते स्वतःचे असो वा नसो), रस्त्यावर फेकणारा शेतकरी असुच शकत नाही. हे नक्कीच त्या ऐहीक स्वार्थाने बरबटलेल्या नेत्यांचे क्लोन आहेत, हे नीटसे समजा.
मुद्दा हा आहे की, मागणी आणि पुरवठ्याचे तंत्रावर आधारीत, स्थानिक पातळीवर लागणा-या वस्तुंचे उत्पादन स्थानिक पातळीवरच करणे व अधिकचे बाहेर विक्रीसाठी पाठवणे. व त्याद्वारे, शेती-आधारीत कुटीरोद्योग, गृहोद्योगाचे जाळे निर्माण करणे अतिशय गरजेचे आहे. लवासा सारखे उद्योग १५ वर्षात एवढी मालमत्ता व नफा कमावु शकतात तर, असे उद्योग(कुटीरोद्योग, गृहोद्योग, लघुउद्योग) , व्यापारी वृत्तीने , गावागावात का नाही केले जाऊ शकत. तर मित्रांनो, हे करता येणार असेल तर कसे, याबाबत चर्चा होऊ शकते काय?

Monday, April 24, 2017

मिळकतीचे वाटप सामंजस्याने करणेच योग्य

मिळकतीचे वाटप सामंजस्याने करणेच योग्य

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 खालील वाटप - 

शेत जमिनीच्याबाबतीत शासनाने वाटप होण्यासाठी जर आपापसांत वाद नसतील तर वाटपाची प्रक्रिया पुष्कळ सोपी केलेली असून, ती कमी खर्चिकसुद्धा असते. यामध्ये सर्व सहदायकांनी मिळून मा मलतदाराकडे सर्व चालू 7/12 चे उतारे, खाते उतारा व सदर ज मीन एकत्रित कुटुंबाकडे कशी आली याचे आवश्‍यक फेरफार दाखल अर्जासोबत सादर करून स्वत:च आपापसात सरस-निरस वाटप करून तसे जबाब दिल्यास त्याच्या आदेशाने वाटपाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. यात सर्वांत मोठा अडथळा मुंबई तुकडे बंदी व तुकडेजोड कायदा 1947 खालील तरतुदींचा येऊ शकतो. 


या कायद्याप्रमाणे जमिनींचे पुढील तुकडे विभागानुसार 40 आर., 20 आर. किंवा 10 आर. क्षेत्रापेक्षा कमी झालेले चालत नाहीत. कोणत्याही धारण जमिनीत एकाहून अधिक सहधारक असतील तर आपल्या हिश्‍श्‍याच्या विभाजनाकरिता मामलतदाराकडे असा अर्ज करता येईल, मात्र त्यासही इतर सर्व सहधारक व सह-हक्कधारक यांची संमती आवश्‍यक असते. 


जमिनीच्या मालकीबाबत कोणतेही वाद उद्‌भवल्यास अशा प्रश्‍नांचा निर्णय दिवाणी न्यायालयात लागणे बंधनकारक असते. नंतरच पुढील प्रक्रियेकामी हे प्रकरण महसूल विभागाकडे येते. सर्व सहधारक वा सहहक्कधारक यांची बाजू ऐकून घेणे, त्यांना तशी स ंधी देणे हे नैसर्गिक तत्त्वाचे पालन होणे कायद्याला अभिप्रेत असते.


शासनास महसूल देण्याचा व धारण जमिनीचे विभाजन करताना यो ग्य रीतीने झालेला खर्च महसूल अधिकाऱ्यास योग्य वाटेल अशा प्र माणात वसूल करता येतो. 


मिळकतीचे वाटप सामंजस्याने करणेच योग्य 
ज्या विनंतीवरून विभाजन झालेले आहे अशा सहधारकाकडून किंवा विभाजनात ज्यांचा हितसंबंध असेल, अशा व्यक्तींच्या हिश्‍श्‍या मधून महसुलाच्या मागणीप्रमाणे विभाजन करून वसूल करण्यात येईल. जमिनीच्या वाटपासाठी या कलमात खास तरतूद करण्यात आलेली आहे. बरेच शेतकरी तलाठ्याकडे वाटपासाठी अर्ज देऊन विनंती करतात, मात्र तलाठ्यास या संबंधाने कोणतेही अधिकार नाहीत. हे या संबंधाने लक्षात घ्यावे, तसेच न्यायालयाचा हुकूमना मा झाल्यानंतर पुढील अंमलबजावणीकामी कलम 85 खाली महसूल यंत्रणेकडे सोपविले जाते.



मामलतदारास करावयाच्या अर्जात पुढील गोष्टींचा समावेश असावा :
1) धारण केलेल्या एकत्र कुटुंबाचे एकूण क्षेत्र, त्याचा सर्व्हे नं. (गट नं.) वा हिस्सा नंबर प्रत्यक्षात 7/12 प्रमाणे पोटखराब्यास हित 
2) धारण शेतजमिनीची पट्टी/शेतसारा/वा चावडी
3) सहधारकांचे सध्याचे व नियोजित नावे, पत्ते आणि हिस्से
4) अर्जासोबत सर्व 7/12 च्या, खातेउतारा व आवश्‍यक त्या फेरफार नकला जोडणे अभिप्रेत
5) अर्ज दोन प्रतींत तयार करावा. एका प्रतीवर बारनिशी कारकुनाची पोच सहीशिक्‍क्‍यानिशी घ्यावी. अर्जावर सर्व सहदायक/ हक्कदार यांच्या संमतीदर्शक सह्या घ्याव्यात.
6) अर्ज प्राप्त झाल्यानंतर मामलतदार सर्वांना नोटिसा बजावतील व सुनावणीसाठी योग्य त्या दिवशी समोर हजर राहण्याकामी नोटिशीत उल्लेख असेल, त्या दिवशी मामलतदार सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतील, लेखी वा तोंडी जबाब नोंदवून घेतील. आवश्‍यक कागदपत्रे अपुरी असल्यस वा अधक पुरावे आवश्‍यक असल्यास ते सादर करण्याविषयी पक्षकारास सूचना देऊन पुढील तारीख ने मतील.
7) सर्व अर्जदारांचे व संबंधितांचे म्हणणे ऐकून नियम दहाप्रमाणे तुकडेबंदी व तुकडेजोड कायद्याच्या तरतुदी लक्षात घेऊन या कायद्याचे कलम 230 फार्म "अ'प्रमाणे सर्व हिस्सेदारांना, सह हिस्सेदारांना व संबंधितांना नोटिसा काढतील. यात गहाणदार बॅंक, पतसंस्था, सावकार वा इतर बोजेधारक यांचा समावेश असतो.



वाटपाचा जाहीरनामा -
वाटपाचा सर्वसाधारण मसुदा तयार झाल्यानंतर त्याचा नमुना फॉर्म नं. "ब' प्रमाणे जाहीरनामा तयार केला जातो. त्याची योग्य ती जा हिरात दर्शनीभागी मामलेदार कचेरी, चावडी, तलाठी कचेरी, गावातील सार्वजनिक जागी, बैल, शेती वगैरे ठिकाणी प्रकाशित केली जाते.



आवश्‍यक कार्यवाही -
हरकती नोंदविण्याची योग्य ती संधी दिल्यानंतर व त्या संबंधित मुदत संपल्यानंतर मामलतदाराची खात्री झाली व सर्वांचे म्हणणे ऐकून त्यांचे मत असे झाले, की अर्जदार यास अर्जातील ज मिनीबाबत रस नाही किंवा जमिनीच्या मालकीबाबत वाजवी तक्रारी आहेत तर ते असा अर्ज आवश्‍यक शेरा ठेवून रद्द करतील. अर्जातील जमिनीबाबत भांडणे असतील तर निवाड्यासाठी दिवाणी कोर्टात जाणे कामी सूचना देतील.



वाटपाची पद्धत :
जर मामलतदाराने सर्व संधी दिल्यानंतर अर्ज नाकारला नाही तर ते स्वत: किंवा योग्य त्या निर्देशित महसूल अधिकाऱ्यामार्फत वाटपाची पुढील कार्यवाही करतील. शक्‍यतो प्रत्यक्ष वाटप करताना प्रत्येक सहहिस्सेदारांच्या हिश्‍श्‍यात संपूर्ण सर्व्हे नंबर/ गट नंबर वा त्याचा पोट विभाग येईल याची दक्षता घेतील. पुढे त्या संपूर्ण गटांचे पुनर्वाटप होत नाही. सर्व क्षेत्र हे आटोपशीर, गरजेनुसार ते प्रत्येक पक्षास द्यावे अशीही दक्षता घेतील. वाटप लेखी स्वरूपात झाल्यानं तर त्यावर काही हरकती/सूचना असल्यास सर्व सहहिस्सेदारांचे म्हणणे ऐकून योग्य त्या दुरुस्त्या केल्या जातात वा मान्य केले जाते. असे मान्य वाटप व दुरुस्त वाटप याची अंमलबजावणी शेतीचे नवीन वर्षापासून प्रत्यक्षात केले जाते किंवा तेव्हापासून ग्राह्य धरले जाते.



वाटपाचा खर्च 
वरीलप्रमाणे झालेल्या वाटपाचा खर्च कलम 85(5) प्रमाणे सर्व सह हिस्सेदार, भागीदार, पक्षकार, अर्जदार यांच्याकडून वसूल केला जातो.
मुदतीचा कायदा - शेतजमिनीच्या वाटपासाठी मामलतदाराकडे अर्ज उशिरा दाखल केला म्हणून अर्ज मुदतीत नाही हे ग्राह्य नसते. त्यास मुदतीच्या कायद्याचा अडसर नसतो. 



हुकूमानंतर - मामलतदाराकडून वाटपाचा हुकूम झाल्यानंतर अ भिलेख 7/12 ला हक्कदुरुस्ती फेरफार करण्यासाठी तलाठ्याकडे पाठविले जाते. तलाठी हुकमानुसार गाव न. नं. 6 ड ला फेरफार घेऊन 7/12 दुरुस्त करतात. या कामी परत पक्षकारांना नोटिसा बजावण्याची गरज नसते किंवा नोटिशीचा कालावधीही लागू पडत नाही. याचा अर्थ तत्काळ 7/12 दुरुस्त होणे आवश्‍यक ठरते.


वाटपानंतरचा ताबा - वाटपातील तपशिलाप्रमाणे सर्व सहहिस्सेदारां नी जागेवर ताबा घेतला असे समजले जाते, मात्र काही वाद उद्‌भवल्यास महसूल अधिकारी पंचांसमक्ष जागेवर ताबा देवू शकतात. थोडक्‍यात एकत्र कुटुंबाचे मिळकतीचे वाटप समजून/उ मजून सामंजस्याने करणेच श्रेयस्कर ठरते. कारण वाद उद्‌भवल्यास ते किती काळ चालतील, किती पैसा खर्च करतील व किती शक्तीचा व्यय करतील हे कुणीच सांगू शकत नाही. म्हणून तुमचे वकील काहीही म्हणोत जुन्या माणसांचे म्हणणे ऐका की "शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये.'

Friday, April 7, 2017

पर्यावरण संरक्षण, संवर्धनात व वनशेती मध्ये वेल्हा बनु शकतो रोल मॉडेल


भाग - १

इकॉलॉजिकली सेंसीटीव्ह एरीया, म्हणुन वर्गीकरण झालेल्या क्षेत्रात, वेल्हे तालुक्यातील सर्वच(मोजकी ३-४ गावे सोडुन) गावांचा समावेश झालेला आहे. अशा प्रकारे पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असणा-या या तालुक्यात मग विकासाची गंगा कधी येणारच नाही का? जंगलांचा आज तागायत झालेला –हास , व अजुनही पत्येक वर्षी वणव्यांच्या रुपाने होणारी अपरीमीत हानी कधी थांबेल काय? शहराकडे स्थलांतरीत होऊ लागलेल्या येथील लोकांस येथेच कायमस्वरुपी रोजगार मिळणार नाही काय? वनौपज संरक्षण व संवर्धनातुन रोजगार, व्यवसाय निर्मिती होणार नाही काय? या व अशा अनेक प्रश्न , समस्यांवर व्यापक विचार करण्याचा येथे प्रयत्न केला आहे. 

पावसाळ्यात नयनरम्य वाटणारे हेच डोंगर, उन्हाळ्यात मात्र अप्रेक्षणीय होतात.



उत्तरी-पश्चिम घाट , तेव्हा  आणि आता या शीर्षकाचा एक व्हिडीयो युट्युब वर पाहीला.इकॉलॉइकल सोसायटी ने सर्वेक्षण करुन अभ्यास करुन उत्तर - पश्चिम घाटाविषयी अतिशय सखोल माहीती यात दिली आहे.

पश्चिम घाट उत्तरेकडे गुजरात, डहाणु पासुन सुरु होऊन, दक्षिंणेत केरळ पर्यन्त पसरला आहे. अंदाजे लांबी १६०० किमी तर अंदाजे क्षेत्रफळ ६०,००० चौ कि मी आहे. किमान १५ करोड वर्षापुर्वी गोंडवन नावाच्या एका भुखंडाचे तुकडे झाल्याने व तो पुर्वोत्तर सरकल्यामुळे, युरेशिया खंडाला येऊन मिळाला. असे झाल्यामुळे अंदाजे ६.५ कोटी वर्षापुर्वी इथे ज्वालामुखीचा उद्रेक होऊन,दख्खन चे पठार म्हणतात ते निर्माण झाले. 

या पश्चिम घाटास आपण सह्याद्री असे ही म्हणतो. दक्षिंणेकडील बाजुने आपण पश्चिम घाट पाहीला तर असे स्पष्ट पणे जाणवते की, महाराष्ट्राच्या उत्तरेकडे पश्चिम घाटाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. पुण्याचेच उदाहारण घ्या. पुण्याच्या पश्चिमेला चार तालुके आहेत. मावळ, मुळशी , वेल्हे व भोर. या चार ही तालुक्यातील पश्चिमेकडचा सर्वच्या सर्व भाग, ज्यास स्थानिक भाषेत "मावळ" असेच म्हणतात, हा खुद्द पश्चिम घाटाचाच एक भाग आहे. तसेच आणखी उत्तरेकडे गेल्यास भीमाशंकर दिसते. एक संरक्षित क्षेत्र म्हणुन भीमाशंकर अभयारण्य व तेथील वनराई बहुंशी शाबुत आहे. पुणे शहराच्या पश्चिमेकडील या चार ही तालुक्यातील जंगलांचा, वनक्षेत्रांचा, डोंगर उतारांचा -हास खुप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. 

मागच्याच आठवड्यात मुळशी-ताम्हिनी परीसरात जाण्या्चा योग आला. मुळशी धरणाचे पाणी उजव्या बाजुला दिसायला लागताच डावीकडील डोंगररांगामध्ये असणारी गर्द वनराई लक्ष वेधुन घेते. उंच च्या उंच डोगररांगा व त्या डोंगरांच्या खांद्यावर वाढलेली जंगले, हे म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारेच होते. ही वनराई अगदी कोकण भागापर्यंत दिसुन येते.

याच्याच विरुध्द अवस्था वेल्ह्याची आहे. या दिवसात, म्हणजे फेब्रुवारी नंतर मे पर्यंत जर वेल्ह्या च्या मावळ भागात प्रवासाचा तुम्हाला योग आला तर, तुमचे लक्ष वेधुन घेईल ते म्हणजे जळालेले डोंगर, तर कुठ जळणारे डोंगर. नुसतेच डोंगर जळतात असे नव्हे, तर वेल्ह्यातील किल्ले देखील जळतात. तोरणा जळला आहे, राजगड देखील जळलाय. तोरणा किल्ल्याच्या पश्चिमेकडील डोंगररांगेवर अतिशय छान जंगल आहे. बहुधा ते वनविभागाच्या ताव्यात असावे. पण ते ही जळाले आहे. निवी, विहीर, अंत्रोली, बाघदरी ची अवस्था देखील अशीच आहे. राजगड व तोरणा किल्ल्यास जोडणारी रांग देखील जळुन खाक झाली आहे. इकडे, वरोती, कोलंवी, घिसर भागात देखील कमी अधिक प्रमाणात डोंगर जळाले आहेत. जाधववाडी मधुन पासली कडे जाताना,रस्त्याच्या डाव्या बाजुला असलेला भुखंड देखील जळुन गेला आहे. 

मी ब-याचदा गावक-यांशी या विषयावर बोलतो तेव्हा समजते की बहुतांश लोकांना वणवा नको असतो. वणवा लागल्या मुळे, मे महिन्यापर्यंत चरण्यासाठी शिल्लक असणारे गवत, फेब्रुवारी महिन्यातच संपते, व जनावरांस वण वण भटकावे लागते. कित्येकदा गावकरी, वणवा विझवताना देखील दिसतात. 

जर हे वणवे लागण्याचे कारण रस्त्यावरची वर्दळ असेल तर, शासनाने (म्हणजेच तहसील, वनविभाग ) रस्त्याच्या दुतर्फा जाळ रेषा, कमीत कमी २० फुटाची काढणे गरजेचे आहे. 

तसेच चुकुन वणवा लाअगलाच, तर त्या वणव्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठीच्या उपाय योजना देखील करायला हव्यात. जसे, नैसर्गिक जे पाण्याचे प्रवाह आहेत, त्या प्रवाहातुन आग, एका बाजुकडुन दुस-या बाजुस जाऊ नये यासाठी, त्या पाटातील (नाल्यातील किंवा नाळेतील) दोन बाजु जोडणारी वाळलेली लाकडे, गवत काढुन घेणे, जेणे करुन आग लागलीच तर ती एका बाजुलाच अडकेल, दुस-या बाजुस जाणार नाही.

सोबतच रस्त्याला व पहील्या जाळरेषेला समांतर दुसरी जाळरेषा, किमान १०० मी अंतरावर काढली तर दुर डोंगरमाथ्यावर आग पोहोचण्याची शक्यताच राहणार नाही.

वरकरणी जाळ रेषा काढली पाहीजे असे म्हणायला खुप सोपे आहे पण प्रत्यक्षात हे काम करणार कसे व कोण? त्यासाठी निधी कोण देणार? मनुष्यबळ कुठुन मिळणार?

तर यासाठी आपण म्हणजे शासनाने पुढची पाच वर्षे किमान, नवीन झाडे लावायचे बंद केले की मनुष्यबळ मिळेल, निधी देखील मिळेल. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांवर दरवर्षी शेकडी कोटी रुपये खर्च केले जातात. व आज पर्यंत या वृक्षारोपण कार्यक्र्मातुन लावलेल्या झाडांची जंगले आपण कधी पाहीली नाहीत.  तर हा खर्च टाळुन शासनाने, वणव्यापासुन डोंगररांगाचे संरक्षण जर केले, तर आपोआप बीज अंकुरतील, रोपे येतील, जंगले वाढतील. कारण एक एक वृक्ष लाखो बीजांची निर्मीती करतो, गरज असते फक्त हे बीज जळु न देण्याची.  वृक्षारोपणाचा निधी इकडे संरक्षणाकडे वळवल्यास, स्थानिक लोकांस रोजगार हमी च्या अंतर्गत, कामे देऊन ज्या जाळ रेषा काढण्याचे काम करता येऊ शकते.

महोद्य, आपणास विंनती आहे की, आपण वरील संदेश गांभीर्याने घ्याल, यावर अधिक अभ्यास करुन योग्य ती पावले उचलाल. आपण वेल्हा तालुक्यापासुन सुरुवात करुन एक रोल मॉडेल तयार करुन सर्वांसमोर आदर्श ठेवु शकता.
आपण जर खरच असे काही करु शकलो, तर फक्त पाच वर्षांच्या कालावधी मध्येच हा उत्तरी-पश्चिम घाट देखील पुन्हा सदाहरीत होऊन इथे देखील जैव विविधतता जोपासली जाईल.

(या संदर्भात आणखी कसल्याही सल्ल्या-माहीतीची आवश्यकता असल्यास आपण मला ०९०४९००२०५३ वर संपर्क करु शकता, किंवा या इमेल वर देखील संपर्क साधता येऊ शकतो.)

श्री हेमंत सिताराम ववले